पुणे – उरवडे येथील एसव्हीएस अक्वा कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवरून मुळशी पॅटर्न फेम अभिनेते प्रविण तरडे यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रविण तरडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कंपनीची छोटीशी जागा पाहून तरडे यांनी संताप व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंचांनी इतर कंपन्यांना भेटी देऊन पाहणी करण्याचं आवाहन केलं.
40 बाय 40 च्या ठोकळ्यात 38 माणसं काम करतात का कधी? 40 बाय 40 च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला. हे सगळं भयाण आहे. यात दोष कोणाला देणार अशी व्यवस्था असेल तर, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे –
वेदना काय असतात ते आज कळलं –
“मुळशीतील सर्व राजकिय पक्ष, सर्व कामगार संघटना, सामाजिक संस्था, कंपनी व्यवस्थापन आणि स्वत: गावकऱ्यांनी एकत्र येऊन भविष्यातील असे अपघात टाळले पाहीजेत… कारण एमआयडीसी वाटेल असं कुठलच लक्षण प्रत्यक्ष गेल्यावर तिथं दिसलं नाही .. अरूंद रस्ते आणि छोट्या जागेत मोठ्या मशिन .. पाण्याचं लायसन्स असलेली कंपनी सॅनिटायझर बनवत होती.. कसं काय..? कोणी दिली परवानगी..? मित्रांनो माणसाच्या जीवासाठी एकत्रित लढलं पाहीजे .. १७ मृत कामगार भगिनींना योग्य न्याय देण्यासाठी माणूस म्हणुन झटलं पाहीजे .. नाहीतर अनेक घटनांसारखी ही घटना सुध्दा विसरून जावू .. आणि पुन्हा जागे होऊ नवीन अपघात झाल्यावर .. चला सर्वांनी एकत्र यायची वेळ आलीये आपल्या माणसांसाठी.”