नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यातच देशाला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. शनिवारी गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात एक लाख 14 हजार 460 कोरोना रुग्णांची भर पडली असून 2677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात देशातील 1.89 लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 77,449 रुग्णांची कमी आली आहे.
देशात सलग 24 व्या दिवशी करोना रुग्णसंख्येपेक्षा जास्त रुग्णसंख्या करोनामुक्त झाली आहे. शनिवारपर्यंत देशात 23 कोटी 13 लाख 22 हजार करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी एकाच दिवसात 33.53 लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत.
देशातील करोनामुळे होणारा मृत्यू दर हा 1.20 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 93 टक्के आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.