डागडुजीच्या गुणवत्तेवर मात्र प्रश्नचिन्ह
पुणे – शहरात मंगळवारपासून सर्व व्यावसायिक तसेच व्यापारी दुकाने उघडणार आहेत. त्यामुळे खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी सोमवारी भर पावसात डांबरीकरण केल्याचे समोर आले आहे. प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भर पावसात केलेल्या रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता असे प्रमुख रस्ते ड्रेनेज तसेच समान पाणी योजनेच्या जलवाहिन्यांसाठी खोदण्यात आले आहेत. महापालिकेने लॉकडाऊनची संधी साधत हे काम हाती घेतले. ते विक्रमी वेळेत पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते दुरुस्ती झालेली नव्हती.
लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, हे काम 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, करोनाबाधितांचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने प्रशासनाने 1 जूनपासूनच सर्व दुकाने पुन्हा सुरू करण्यास मुभा दिली आहे.
परिणामी, मंगळवारपासून या बाजारपेठा गजबजणार आहेत. त्यामुळे महापालिकेने सोमवारी दिवसभर या भागातील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यातच दुपारी तीननंतर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, भर पावसात लक्ष्मी रस्त्यावर रस्त्यावर डांबर टाकून दुरुस्तीचे सुरूच असल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसात तयार करण्यात आलेला हा रस्ता टिकणार कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अनधिकृत खोदकामे थांबवा
महापालिकेने दिलेली मुदत संपलेली असतानाही अनेक खासगी कंपन्या केबलसाठी खोदकाम करत आहेत. हे रस्ते निसरडे झाले आहेत. पावसामुळे येथे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने ही खोदाई थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. या कंपन्यांना 30 एप्रिलपर्यंत खोदाईस परवानगी होती. मात्र, आयत्यावेळी प्रशासनाने त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ दिली.
भर पावसात डांबरीकरणाचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पावसात रस्ते दुरुस्ती कधीही टिकणार नाही. त्यामुळे पुढच्या 15 ते 20 दिवसांत हा रस्ता उखडल्याशिवाय राहणार नाही. करदात्यांच्या निधीची ही सरळसरळ उधळपट्टी आहे. हा रस्ता खराब झाल्यास संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनातून हा खर्च वसूल करावा.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच