नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यासंदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवत. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात असून मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत असी टीका आज राऊत यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेसोबत आम्ही सगळे सहमत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटले पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. पण त्यांना खरी भेट ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी काल भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजी राजे यांनी यावेळी सरकारसमोर ५ मागण्या ठेवल्या असून त्यापूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंतचा वेळ दिला आहे. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.