जळोची -नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मदत ही फक्त गुजरातसाठी जाहीर केली.
आम्ही सर्व आशावादी आहोत की, महाराष्ट्रसह इतरही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल. महाविकास आघाडी सरकारबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले की, खंड जगावर करोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख करोनाबाधीत रुग्ण आढळून येत होते. अशावेळी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. विविध कार्यक्रमात मोठी गर्दी होत होती.
यामुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या. तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे.
तरी केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून ही कंपनी सुरु करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.