– डॉ. गिरधर पाटील
करोनाच्या बाबतीत अनेक बदलते वाद-प्रवाद शेवटी मानवाचे हित साधण्याऐवजी व्यवस्थेचे बळी या सदरात मोजता येतील. शेवटी प्रत्येक जिवाला आपापली काळजी घेण्याचे एक इनबिल्ट सयंत्र असते. प्राणी त्याचा वापर करत आपला जीव वाचवू शकतात.
असं म्हणतात की, एकूण वैश्विक ज्ञानाच्या केवळ दोन ते तीन टक्के ज्ञान मानवाला ज्ञात असावे. त्या ज्ञानाच्या आधारावर एवढ्या आत्मविश्वासाने उड्या मारणे चालू आहे. कुणीतरी आज मांडलेला सिद्धांत उद्यापर्यंत टिकेलच असे नाही आणि अशा मांडणीमागे काही ठरावीक उद्देश असला तर तो त्वरितच उघडा पडावा, अशी निसर्गाची योजना असते. एकूण वैद्यकीय ज्ञानाच्या किती टक्के आपल्याला माहिती आहे हे माहीत नसताना तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारावर साऱ्या मानव जातीचेच भवितव्य ठरवणे हे या प्रजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
मानवी वंशाला वाचवण्याचे सारे प्रामाणिक प्रयत्न मानवतेच्या दृष्टिकोनातून क्षम्य ठरत असले तरी छुपे भौतिक लाभ हेच ध्येय असणाऱ्या बाजार व शासन नामक व्यवस्थेचे प्रयत्न व ते राबवणारी पोटार्थी पगारी व्यवस्था व एकूणच यातील छुपे लाभार्थी यांचे खरे उद्देश लक्षात घेणे महत्त्वाचे असते. त्यात साखरपेरणी, सक्ती, बंधने, कोंडी, कायदा, नियम व अगतिकता आली की ती तपासण्याची गरज ठरते.
आजच्या परिणामांना भूतकाळातील काही असे कारण दिसते का याचा विचार व्हायला हवा. कारण मानवच नव्हे तर मानवी सान्निध्यातील अनेक पाळीव प्राणी एका समान अशा परिस्थितीला सामोरे जात आहेत. आपल्यापैकी काहींच्या पंचेंद्रियांना जाणवलेल्या निरीक्षणातून एक मोठी मांडणी यातून उदयास आलेली दिसते. ती शास्त्र व विज्ञानाच्या स्वरूपात आणली की तिला विरोधही कठीण होऊन बसतो. या मांडणीला मानवी स्वार्थ व अर्थवादाची साथ मिळाली की तिला सर्वमान्यताही मिळू शकते. एकदा या पातळीला सारे पोहोचले की, आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य असा हट्ट धरत अनेक पर्यायी शक्यतांना बाजूला सारत हा हटवाद बळावू शकतो.
करोनाच्या बाबतीत अनेक बदलते वाद- प्रवाद शेवटी मानवाचे हित साधण्याऐवजी व्यवस्थेचे बळी या सदरात मोजता येतील. शेवटी प्रत्येक जीवाला आपापली काळजी घेण्याचे एक इनबिल्ट सयंत्र असते. प्राणी त्याचा वापर करत आपला जीव वाचवू शकत असले तरी मानव या साऱ्या अंतःप्रेरणा विसरल्याने त्याला अशा बाहेरी यंत्रणांना बळी पडावे लागते आहे. प्राण्यांना बरे वाटेनासे झाले की ते प्रथम अन्नत्याग करतात. पोटात काही नकोसे झाले तर मांसाहारी प्राणीही गवत खाऊन उलटी करून मोकळे होतात. हे शिकायला त्यांना कुठल्या विद्यापीठात जावे लागत नाही तर तो केवळ त्यांच्या अंतःप्रेरणांचा आदर करण्याची प्रवृत्ती असते.
आदिवासी जीवनशैलीही अशा अंतःप्रेरणांवर आधारलेली असल्याने त्यांनाही आधुनिक आजारांची ओळख न झाल्याचे दिसते. करोना वा त्या सदृश विषाणूंचा प्रवेश हा मुख्यत्वे नाकाद्वारे होत असल्याने पहिली प्रतिक्रिया तेथे शिंकांच्या स्वरूपात येत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो. ही यंत्रणा नाकात सक्रिय असते. कारण विषाणूच नव्हे तर काही गंध वा वास, वा धुळीचे कणही शरीरात जाण्यापासून रोखले जातात. नंतर येणारा घशातील चिकट कफ, खोकला वा ताप ही सारी यंत्रणा विषाणूंच्या प्रतिकाराची आयुधे आहेत व त्यांना अटकाव करणे म्हणजे विषाणूंना पायघड्या टाकण्यासारखे असते.
ताप हे रोगाचे लक्षण नसून आपल्या प्रतिकाराचा प्रयत्न असतो व आपल्या हिताचा असतो. तापावर अँटिबॉयोटिक्सचा मारा हा प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करणारा ठरू शकतो. मुळात अँटी म्हणजे विरोधी व बॉयोस म्हणजे जीवन, म्हणजे जीवनाच्या विरोधी ते अँटिबॉयोटिक असे समजायला हरकत नाही. होमिओपॅथित कुठलेही अँटिबॉयोटिक नसताना सारे प्रादुर्भाव ट्रिट केले जातात. म्हणजे ते अनिवार्य नाहीत. हल्ला झाल्यानंतर पहिले पथ्य म्हणजे अन्नत्याग. अन्नपचनात खर्च होणारी सारी ऊर्जा ही शरीराला पुढच्या लढ्यासाठी आवश्यक ठरते.
आजारी पडल्यावर भूक न लागणे वा चव जाणे ही त्याचीच लक्षणे असतात. हे सारे होईपर्यंत तुमची प्रतिकारशक्ती कार्यान्वित झालेली असते व करोनात 80 टक्के रुग्ण अशा मार्गाने काही एक न करता बरे झालेले असतात. तापात उपाशी राहात केवळ पाणी व नैसर्गिक प्राणिज ऊर्जा असलेले फळांचे रस हे शरीरातील आम्लता नाहीशी करत विषाणूंना निष्प्रभ करतात. चांगला घाम येणे हे त्याचे एक लक्षण.
ऑक्सिमीटर हे काही दिवसांपासून वापरात आले आहे. प्राणवायूचे प्रमाण श्वसनसंस्थेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. होमिओपॅथीतील कार्बो व्हेज हे औषध बाहेरील प्राणवायूची गरज कमी करत श्वसनसंस्थेला उद्दिपीत करू शकते. जोडीला इतर इन्फेक्शन असले तर पल्सेटिला देता येईल. ब्रायोनिया देऊन कफ बाहेर टाकला जातो. आयुर्वेदात अशा अनेक संकल्पनांवर आधारलेल्या उपाययोजना सुचवल्या जातात.
केवळ औषध घेणे वा देणे यालाच उपचार समजत, ज्यात केवळ आर्थिक उलाढाल असल्यानेच त्यांचा आग्रह धरला जातो. अशा या पर्यायी प्रयत्नांना सामूहिक प्रयत्नात का सहभागी केले जात नाही हा शासन पद्धतीच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. या आजाराचा प्रोटोकॉल आपणच ठरवायचा वा ठरवून घ्यायचा व त्यातील गुपिते बाहेर न येऊ देण्याचा सरकारांचा प्रयत्न असतो. आज या साऱ्या व्यवस्था कोसळल्याने त्यामुळे करोनाचे उपचार सोपे असूनही कठीण होत गेल्याचे दिसते व त्यामुळे होणारे वाढते मृत्यू करोनाच्या नावावर टाकत परत करोनाचीच भीती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.