नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्याला अपवाद उत्तर प्रदेश देखील नाही. इथेही कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे रुग्णासह नातेवाईकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही कमतरता नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच योगींना खोटे ठरवले आहे.
लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिले होते. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचे गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचे म्हटले आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. ‘लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही’ अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या योग्य प्रयत्नांअभावी सर्व वाया जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कायदेमंत्री बृजेश पाठक हे राज्य सरकारला पत्र लिहिणारे पहिले निर्वाचित सदस्य होते. त्यांनी आपल्या पत्रात लखनऊ प्रशासनाच्या कारभारावर लक्ष केंद्रीत केले आहे. बेड, ऑक्सिजन आणि योग्य उपचार न मिळाल्यानं लोकांना जीव गमवावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. तसेच मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनीही अनेकदा परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी सरकारी रुग्णालयांत स्वत: लक्ष घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.