ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ।। 193 ।
माउली येथे आत्मज्ञान अवगत न करता अज्ञानी राहण्यात समाधान मानणाऱ्या व्यक्तींविषयी भूमिका स्पष्ट करतात. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त करण्याची आवड नाही, तो जिवंत आहे असे म्हणणे योग्य आहे का? ज्ञानापासून वंचित राहण्यापेक्षा त्याने मरण पत्करलेले चांगले.
आत्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छाही जो मनात ठेवत नाही, तो सर्वस्वी संशयरूपी अग्नीत पडला आहे असे समजावे. जोपर्यंत आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत स्थिरता प्राप्त होत नाही. जीव ब्रह्मऐक्य या अद्वैत भाव संबंधाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यावर ब्रह्मसुखाचा अनुभव येतो.