नवी दिल्ली, दि. 27- देशातील करोनाची स्थिती हाताबाहेर गेली असताना आणि वैद्यकीय सामग्रीचा तुटवडा भासत असताना भारताला परदेशातून पहिली मदत मिळाली आहे. ब्रिटनने पाठवलेले काही साहित्य आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
भारतात गेल्या 24 तासांत आणखी 3 लाख 20 हजार नव्या रूग्णांची भर पडली आहे.
लाखांच्या संख्येत रूग्ण वाढत असताना आणि सगळ्यांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे रूग्ण आणि त्यांचे नातलग हवालदिल झाले आहे. रुग्णालयांच्या पार्किंगमध्ये, व्हरांड्यात, झाडाखाली, गाडीमध्ये, रिक्षेत असे मिळेल त्या ठिकाणी रूग्णांना झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे चित्र भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे. याची जगभरात दखल घेतली गेली असून दहा देशांनी भारताला मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार आज ब्रिटनकडून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची उपकरणे पाठवण्यात आली. ही मदत अत्यंत तुटपुंजी असली आणि समुद्रातल्या पाण्याचा एक थेंब एवढी नसली तरी संकटाच्या या काळात भारताला त्यामुळे थोडातरी दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आपण मुंबईच्या अनेक रूग्णालयांच्या अनेक वॉर्डमध्ये जाऊन पाहणी केली आहे. रूग्ण श्वास घेण्यासाठी तडफडत आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकाराचे आणि आकाराचे व्हेंटिलेटर लावण्यात आले असल्याचे दयनिय दृश्य निदर्शनास येते आहे असे डॉ. झरीर उदवाडीया यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की पहिल्या टप्यात लसीकरणाला झालेल्या विलंबामुळे आज लसीकरण केंद्रांबाहेर लसीचा पहिला डोस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येते आहे.
पूर्वी लस घेण्याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती होती. आता त्याची जागा लसीसाठीच्या अगतिकतेने घेतल्याचे दिसून येते आहे.
करोनाची किती जणांना लागण झाली अन् त्यात किती जणांचा मृत्यू झाला याचे आकडे सरकारकडून जाहीर केले जात असले तरी प्रत्यक्ष संख्या त्यापेक्षा खूप जास्त असू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. काही तासांपूर्वी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 1 लाख 97 हजार लोक करोनाने मरण पावल्याची बातमी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हा आकडा जास्त असू शकतो असा दावा करण्यात आला आहे. एका इंग्रजी वाहिनीनुसार गेल्या आठवडाभरात एकट्या दिल्लीतच नोंद न झालेल्या मृत्यूंची संख्या 1158 इतकी आहे.