नवी दिल्ली – काही राज्यांकडून करोनालसींच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी आकडेवारी सादर केली. त्यानुसार, राज्यांकडे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसींचे 1 कोटीपेक्षा अधिक डोस शिल्लक असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींचे 15 कोटी 65 लाख मोफत डोस पुरवले. त्यातील 14 कोटी 64 लाख डोसचा आतापर्यंत वापर झाला. त्यामध्ये वाया गेलेल्या डोसचाही समावेश आहे. पुढील 3 दिवसांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आणखी 80 लाख डोस पाठवले जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्राला 1 कोटी 58 लाख 62 हजार 470 डोस पुरवण्यात आले. त्या राज्यात आतापर्यंत 1 कोटी 49 लाख 39 हजार 410 डोसचा (वाया गेलेल्यांसह) वापर झाला. त्यामुळे महाराष्ट्राकडे अजूनही 9 लाखांपेक्षा अधिक डोस उपलब्ध आहेत. त्या राज्याला पुढील 3 दिवसांत आणखी 3 लाख डोस पाठवले जातील, असेही त्या मंत्रालयाने नमूद केले.