नगर (प्रतिनिधी) – रेमडेसिवीरअभावी करोनाबाधित रुग्णांची तडफड सुरु आहे. अशावेळी ज्यांच्याकडे या इंजेक्शन वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते नियंत्रण कक्षातील अधिकारी मोबाईल बंद करुन बसले आहेत. ही अत्यंत शरमेची बाब असून, अशा कठिण प्रसंगात बेजबाबदारपणे वागणार्या अधिकार्यांची यापुढे खैर नाही, अशा सज्जड दम आमदार संग्राम जगताप यांनी आज दिला.
शहरातील अनेक रुग्णालयांमधून रेमडेसिवीर मिळविण्यासाठी सध्या फोनाफोनी सुरु आहे. त्यात अत्यंत कमी संख्येने प्राप्त होणारे रेमडेसिवीर वितरणाची जबाबदारी आता नियंत्रण कक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ज्यांना रेमडेसिवीरची नितांत गरज आहे. त्यांनी या कक्षाच्या वेबसाईटवर मेल करायचे आहेत. त्यांना संपर्क करुन रेमडेसिवीर मिळणार आहेत.
मात्र, येथील अधिकार्यांचेच मोबाईल बंद असल्याने काही जणांनी काल दुपारनंतर याची माहिती आमदार संग्राम जगताप यांच्या कानावर घातली. त्यानंतर आमदार जगताप यांनीही तब्बल वीसवेळा संबंधित विभागाच्या अधिकार्यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईलच बंद असल्याने आमदार जगताप यांचाही संपर्क होऊ शकला नाही.
त्यामुळे संतापतलेल्या आमदार जगताप यांनी थेट नियंत्रण कक्ष गाठून तेथील अधिकार्यांची अत्यंत शिवराळ भाषेत खरडपट्टी काढली. करोनाने कहर माजविला आहे. जिल्हा प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. त्याची उत्तरे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला द्यावी लागत आहेत. लोकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहेत. अशवेळी अत्यंत हलगर्जीपणे काम करणार्या अशा अधिकार्यांना आता ताळ्यावर आणावे लागणार असल्याची प्रतिकि्र्या जगताप यांनी व्यक्त केली.
महापालिका विरोधी पक्षनेत संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनीही वेगवेगळ्या माध्यमातून संबंधित अधिकार्याचा संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील होऊ शकला नाही. लोकप्रतिनिधींचेच फोन लागत नसतील, तर सामान्यांनी काय करायचे? असा सवाल आमदार जगताप यांनी केला.
ऑक्सिजनचा बंद पडलेला टँकर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोचविला
जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशावेळी नगरसाठी ऑक्सिजनचा आलेला टँकर बंद पडतो.ही माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, अविनाश घुले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही.
त्यानंतर या दोघांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांना संपर्काचा प्रयत्न केला. त्यांनीही फोन उचलला नाही. नंतर राष्ट्रवादीच्याच कार्यकत्यांनी टँकरची दुरुस्ती करुन हा टँकर कोविड रुग्णालयांकडे पोचविला. ऑक्सिजन वेळेवर मिळन नसल्याने अनर्थ घटत आहेत. एवढे होऊनही अधिकारी फोन बंद करून बसतात. नातेवाइकांचा संपर्क होवू शकत नाही. त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत असल्याची संतप्त भावना आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.
काळाबाजार थांबविण्यासाठीच…पण….!
रेमडेसिविरचा नगर जिल्ह्यात प्रचंड तुटवडा आहे. त्यातून काळाबाजार होत असल्याचे समोर आले. इंजेक्शनसाठी नातेवाइकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे. त्यात काळाबाजार होऊ नये म्हणून रेमडेसिवीर पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. एन. कातकडे व उपजिल्हाधिकारी किशोर कदम यांची नेमणूक प्रशासनाने केलेली आहे. त्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आलेले आहेत. मात्र, दोन्ही अधिकार्यांशी संपर्क होत नसल्याच्या तक्रारी आहेत.