नवी दिल्ली – सीमेवरील “जैसे थे’ स्थिती बदलू नये यासाठी भारत ठामपणे उभा राहिला. त्यातून कुठल्याही दबावापुढे झुकणार नाही आणि मागे हटणार नाही हे भारताने सिद्ध केले, असे म्हणत संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी कुरापतखोर चीनला स्पष्ट संदेश दिला.
चिनी कुरापतींमुळे मागील वर्षातील काही महिने पूर्व लडाखमधील सीमाभागांत तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, भारतीय जवान मजबुतीने पाय रोवून उभे राहिल्याने चीनला नमते घ्यावे लागले. त्यातून त्या देशाने सैन्य माघारीबाबत सहमती दर्शवली. त्याचा संदर्भ रावत यांनी रायसीन डायलॉग या परिषदेत केलेल्या भाषणावेळी दिला. तांत्रिक बळ मिळाल्याने चीनची सशस्त्र दले सरस आहेत. त्याचा लाभ उठवून इतर देशांना नमवू, असे चीनला वाटते. त्यातून चीनने “जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. पण, भारताने तसे घडू दिले नाही. सीमेवरील तणावावेळी आंतरराष्ट्रीय समुदायही भारताच्या पाठीशी उभा राहिला. भारताच्या दृष्टीने तेसुद्धा मोठे साध्यच आहे, असे त्यांनी नमूद केले.