परभणी – राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार किराणा दुकाने, भाजी, बेकरी यांना अत्यावश्यक सेवेत ठेवण्यात आले आहे. मात्र, परभणीतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पाच दिवस किराणा, भाजी, आणि बेकरीची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, 17 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत किराणा दुकाने, भाजी, बेकरीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, परभणीत करोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत आहे. नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काल बुधवारी एका दिवसात तब्बल 1172 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.