कोलकाता – प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. आठ टप्प्यात घेतल्या जात असलेल्या या निवडणुकीत आतापर्यंतच चारच टप्पे झाले आहेत. मात्र करोनाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून मुर्शिदाबादमधील शमशेर गंज येथील कॉंग्रेसचे उमेदवार रिजाउल हक यांचे करोनामुळे निधन झाले आहे.
निवणुका जाहीर झाल्यापासून राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र खरेतर त्याची सुरूवात एक वर्षापूर्वीच सुरू झाली होती. नेत्यांच्या सभा, रॅली, रोड शो आणि त्यासाठी जमलेला लाखोंचा जनसमुदाय असे वातावरण बंगालमध्ये सातत्याने दिसून येते आहे.
त्यात जो हलगर्जीपणा झाला तो आता या राज्याच्या जनतेला भोगावा लागणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत राज्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता तर थेट उमेदवारांनाच त्याने गाठायला सुरूवात केली आहे.
त्यात रिजाउल हक यांचा बळी गेला आहे. त्यांना लक्षणे दिसू लागल्यानंतर उपाचरांसाठी एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. कॉंग्रेसकडून अधिकृतपणे ही माहिती देण्यात आली असून आपण कोणत्या संकटात जगतो आहोत, त्याच्या वास्तवाची जाणीव ठेवावी. यावर्षी जिवंत राहणेच सगळ्यात महत्वाचे असल्याचे कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.