मुंबई – महाराष्ट्रासह मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने परप्रांतीय मजुरांनी टाळेबंदीची धास्ती घेऊन गावची वाट धरली आहे. शहरातून रोज 30 हजारपेक्षा अधिक मजूर गावी परतत असून एमएमआर क्षेत्रातले उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची भीती आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 30 लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर आहेत. हातावर पोट असलेल्या या मजुरांना दररोज कामावर जावे लागते. मुंबईतली कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या हजारांवर पोहोचली असून टाळेबंदीची भीती या मजुरांमध्ये आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरून रोज रेल्वे गाड्या उत्तरेत जातात. या तिन्ही स्टेशनवर गेल्या तीन-चार दिवसांपासून मजुरांची अफाट गर्दी दिसून येत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या 60 टक्के प्रवासी क्षमतेत चालवल्या जात आहेत. पहिल्या वर्गाचे तिकीट घेण्याची अनेकांची तयारी आहे. मात्र तिकीट मिळण्यात अनेक मजुरांना नकारघंटा मिळत आहे.
रविवारी संध्याकाळी मुंबईत टाळेबंदीची घोषणा होणार आहे, अशी शक्यता अनेक मजुरांनी व्यक्त केली. बरेच परप्रांतीय मजूर होळी, धूलिवंदनला गावी गेले. आठ दिवसांपासून काही परतत आहेत. अद्याप न परतलेल्या मजुरांना मूळ गावीच राहण्याचे निरोप पाठवले जात आहेत. परप्रांतीय मजूर मुंबई सोडून चालल्याने धडपडत सावरणारे उद्योग, व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन लागण्याआधीच सोशल मिडीया व अन्य माध्यमात याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे सत्यपरिस्थिती कळण्याऐवजी संभ्रम निर्माण होत असल्याचे कामगारांनी सांगीतले.