न्युयॉर्क, दि. 26 – भारताने संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत काम करणाऱ्या सुरक्षा जवानांसाठी करोना लसीचे दोन लाख डोस पाठवण्याचा निर्णय घेतला असून उद्या 27 मार्च रोजी हे डोस रवाना केले जाणार आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ही फेब्रुवारी महिन्यात ही घोषणा केली होती. दुसऱ्याच्या कल्याणासाठी कार्यरत राहा असा गीतेचा संदेश आहे त्यानुसारच भारताने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले होते. सध्या जगभरात 12 देशांमध्ये एकूण 85 हजार 782 शांती सैन्य तैनात करण्यात आले आहे. संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत 121 देशांचे सैन्य कार्यरत असून त्यात भारताचेही मोठे योगदान आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऍस्ट्रा झेनकाचे हे डोस उद्या मुंबईतील कतार एअरवेजच्या विमानाने रवाना करण्यात येणार आहेत. कोपनहेगन येथे ते पाठवले जातील. आणि तेथून या लसीचे वितरण केले जाणार आहे.