पुणे -फलंदाजी व गोलंदाजीत सरस कामगिरी करत पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवलेल्या भारतीय संघाला आज होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिका विजय खुणावत आहे. कसोटी तसेच टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकत इंग्लंडला व्हाइटवॉश देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज त्याच इराद्याने मैदानात उतरेल.
एकदिवसीय मालिकेत तीन सामने होणार असले तरीही आज होत असलेल्या सामन्याद्वारे मालिका खिशात टाकण्याची कोहलीच्या संघाला नामी संधी आहे. इंग्लंड संघाला दुखापतींनी घेरले असून त्यांचा कर्णधार इयान मॉर्गनच जायबंदी झाला आहे. या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
अर्थात भारतीय संघालाही दोन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसला आहे. हिटमॅन रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांना दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना चेंडू उजव्या कोपराला लागल्याने रोहितला या सामन्यातून विश्रांती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच क्षेत्ररक्षण करताना खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अय्यर या मालिकेतील उर्वरित सामन्यांनाच नाही तर आयपीएल स्पर्धेलाही मुकणार आहे. त्यामुळे रोहितच्या जागी नवोदीत शुभमन गिलला तर अय्यरच्या जागी भरात असलेल्या सूर्यकुमार यादवला संधी मिळणार आहे.
पहिल्या सामन्यात रोहितचा अपवाद वगळता सलामीवीर शिखर धवन, कर्णधार कोहली, लोकेश राहुल व कृणाल पंड्या या चारही फलंदाजांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. धवनचे शतक जरी हुकले असले तरीही तो भरात अल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.
त्यातच नियमित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या जागी पहिल्या सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या लोकेश राहुलला संधी दिली गेली होती. त्याने या संधीचे सोने करत धडाकेबाज फलंदाजी केली. तो भरात आल्यामुळे भारतीय फलंदाजी आणखीनच भक्कम बनली आहे. भारताची फलंदाजी जितकी भक्कम आहे तोच दर्जा गोलंदाजीचाही आहे. कुलदीप यादवचा अपवाद सोडला तर भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूरने सातत्याने सरस कामगिरी केली आहे.
त्यातच कृष्णा प्रसिध याने पदार्पण साजरे करताना चार गडी बाद करत इंग्लंडला सुस्थितीतून पराभवाच्या खाईत लोटले होते. त्यामुळे याही सामन्यात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहणार आहे. त्याच्या जोडीला आणखी एक पदार्पणवीर कृणाल पंड्या यानेही आपल्यावरची जबाबदारी समर्थपणे पेलताना अर्धशतकी खेळी करत संघाला पहिल्या सामन्यात त्रिशतकी धावांची मजल मारून दिली होती.
तसेच गोलंदाजीतही आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले होते. कर्णधार कोहलीनेही अर्धशतकी खेळी करताना आपणही भरात आल्याचे दाखवून दिल्यामुळे भारतीय संघाचे पहिले पाच फलंदाज याही सामन्यात इंग्लंडची डोकेदुखी ठरणार याची खात्री वाटते. इंग्लंड संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांना या दौऱ्यात प्रथमच खेळाडूंच्या दुखापतीने सतावले आहे.
मायदेशात कोहलीच्या 10 हजार धावा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशात सर्वात कमी डावात 10 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ही कामगिरी केली. कोहलीने 195 डावांमध्ये मायदेशात 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी ही कामगिरी पॉन्टिंगच्या नावावर होती. पॉन्टिंगने यापूर्वी 219 डावात मायदेशात कमीत कमी डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने मायदेशात खेळताना 223 डावात हा पल्ला पार केला होता. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने मायदेशात 223 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. श्रीलंकेचाच दुसरा खेळाडू व माजी कर्णधार कुमार संगकाराने मायदेशात खेळताना 229 डावात हा पल्ला गाठला होता.
कर्णधार मॉर्गन जायबंदी झालेला असल्याने त्यांची फलंदाजी कमकुवत बनली आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय हे भरात असले तरीही त्यांचा सर्वात तगडा खेळाडू व अष्टपैलू बेन स्टोक्स अपयशी ठरत असल्यामुळे त्यांच्या गोटात चिंता कायम आहे. पहिल्या सामन्यात रॉय व बेअरस्टो यांनी 135 धावांची सलामी दिली होती. त्यावेळी हा सामना तेच जिंकतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, कृष्णा व ठाकूरने मोक्याच्या क्षणी बळी घेत संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्यांची गोलंदाजीदेखील भारताइतकी अनुभवी नाही. टॉम व सॅम कुरेन ही जोडगोळी या मालिकेत पहिल्या सामन्यात तरी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकली नाही. तसेच त्यांचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड व ख्रिस जॉर्डन हेदेखील खूप महागडे ठरले होते. त्यांची फिरकी गोलंदाजी देखील पहिल्या सामन्यात धावा रोखू शकली नाही. मोईन अलीने चांगली गोलंदाजी केली तरीही त्याला बळी मिळवण्यात फारसे यश आले नाही.
त्यामुळे दोन्ही संघांचे बलाबल पाहता याही सामन्यात भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार असेच चित्र दिसत आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ इंग्लंडला एकाच दौऱ्यातील तीनही मालिकांत पराभूत करणारा पहिलाच संघ ठरणार आहे. भारतीय संघाला धवन व गिल यांनी धडाकेबाज सलामी दिली व नंतरच्या फलंदाजांनी तेच सातत्य राखले तर इंग्लंडसाठी विजयाची संधी कमी आहे.
मोठ्या धावसंख्येची शक्यता
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी पहिल्या सामन्यात तरी फलंदाजांसाठी नंदनवन ठरली होती. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी पोषक वातावरण मिळाले होते. ही खेळपट्टी व त्यावर झालेल्या सामन्यांचा इतिहास पाहता या सामन्यातही फलंदाजांचेच वर्चस्व राहील अशी खात्री वाटते. या खेळपट्टीवर साडेतीनशे धावा होतील असे क्युरेटर सांगत आहेत. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा सामना होऊन चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.