– अमित डोंगरे
इंग्लंडविरुद्ध कसोटी पाठोपाठ टी-20 सामन्यांचीही मालिका झाली. खरंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिका खेळायला लावण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्न आता पडलेला आहे. भारतीय संघाचा कर्णधार खुद्द विराट कोहलीनेही हाच प्रश्न उपस्थित केला होता. अर्थात बीसीसीआय त्यावर उत्तर देणार नाही कारण भारतीय क्रिकेट संघ पैसे छापण्याची मशीन बनलेला आहे, मग एकदा मशीन म्हटले की ते न थांबता अविरत सेवा देत राहिले पाहिजे असाच होरा बीसीसीआयचा आहे.
यंदाच्या वर्षात भारतीय संघ सातत्याने मालिका खेळत आहे. अमिरातीत आयपीएल स्पर्धेत भारतीय खेळाडू व्यस्त होते. त्यानंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला. तिथे कसोटी मालिका तसेच टी-20 मालिका पार पडली. त्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला व थेट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला. चार कसोटी सामन्यांची मालिका झाली, ती आपण जिंकली.
त्यानंतर लगेचच टी-20 सामन्यांची मालिका झाली. या मालिकेतही संघाने विजेतेपद मिळवले. त्यानंतर आता एकदिवसीय तीन सामन्यांची मालिकाही खेळवली जात आहे.
खेळाडूदेखील माणूस आहे हे बीसीसीआयला कधी समजणार. सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची कथा आणि व्यथा आपण ऐकली आहे. अति हाव माणसाला रिकाम्या हाती ठेवते असे म्हणतात ते काही खोटे नाही. पण बीसीसीआयने मालिका खेळण्याचा दिलेला प्रस्ताव कोणताही देश नाकारू शकत नाही इतकी त्यांची ताकद आहे. कारण भारतीय संघ ज्या मालिकांमध्ये सहभागी होतो त्याच मालिकेत प्रचंड पैसा मिळतो हे उघड असल्यामुळे बीसीसीआय सांगेल ते सध्या जागतिक क्रिकेटमध्ये होत आहे.
एकेकाळी जागतिक क्रिकेटवर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचीच मक्तेदारी होती व भारतीय संघाकडे केवळ पर्यटक म्हणूनच पाहिले जात होते. 1980 च्या दशकापासून परिस्थिती पालटली व बीसीसीआयकडे पैसा आला. आता या पैशांचा धबधबा बनला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ख्याती असलेल्या बीसीसीआयला काहीही शक्य आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार कोहलीनेच बीसीसीआयला घरचा आहेर दिला. एकदिवसीय सामन्यांची मालिका आयोजित करण्याची गरज होती का, असा प्रश्न त्यानेच विचारला म्हणून बरे; अन्यथा एखाद्या समीक्षकाने विचारला असता तर त्याच्यावर चहू बाजूने टीका झाली असती. कोहली म्हणतो त्यात तथ्यही आहे. यंदाच्या वर्षात भारतीय संघ केवळ कसोटी व टी-20 सामने खेळत आहे व पुढील काळातही म्हणजे हे वर्ष संपेपर्यंत याच प्रकारचे क्रिकेट संघ जास्त खेळणार आहे. आपण ऑस्ट्रेलियात तसेच मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळलो.
पण आता ही एकदिवसीय मालिका पार पडल्यावर आयपीएल स्पर्धा आहे. ही स्पर्धा झाल्यावर आपण इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहोत. त्यानंतर टी-20 सामन्यांचा आशिया करंडक आहे. ही स्पर्धा पार पडल्यावर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आहे. म्हणजे तसे पाहिले तर यंदाच्या वर्षात भारतीय संघ टी-20 क्रिकेट जास्त खेळत आहे मग एकदिवसीय सामन्यांची गरज काय होती. अर्थात बीसीसीआयच्या दृष्टीने भारतीय संघ खेळत राहणे महत्त्वाचे, ते कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहे याला काहीही महत्त्व नाही. कारण पैसा येणे हे महत्त्वाचे त्यासाठी क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीशीच नव्हे तर त्यांच्या कारकिर्दीशीही खेळ करायला बीसीसीआय मागेपुढे पाहणार नाही.
ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये मिळून भारतीय संघातील जवळपास 10 ते 12 खेळाडू दुखापतीने बेजार झाले, त्यांना संघातील स्थान गमवावे लागले पण त्याच्याशी बीसीसीआयला काहीही घेणे-देणे नाही. कारण खेळाडूंच्या तंदुरुस्तीपेक्षा कितीतरी जास्त बीसीसीआयला स्वतःची श्रीमंती महत्त्वाची आहे.