मुंबई – परमवीर सिंह हे भाजपच्या पेरोलवर असणारे अधिकारी आहेत. मी सरकार मध्ये असलो असतो तर त्यांची बदली नव्हे तर त्यांना सस्पेंडच केले असते असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. आज फडणवीस यांनी जे आरोप केले त्यांचाही पटोले यांनी समाचार घेतला. फडणवीस सत्तेवर असताना त्यांना कोणाचा कसा वाटा मिळत होता याच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की फडणवीसांच्या काळात झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी आम्ही आजच मुख्यमंत्र्यांकडे करीत आहोत.
राज्य सरकार करीत असलेल्या खंडणी वसुलीत कॉंग्रेसला वाटा किती मिळाला असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणात कॉंग्रेसच्या नेत्यांनी मौन का बाळगले आहे असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पटोले म्हणाले की, देश विकून सरकार चालवणाऱ्यांनी आम्हाला असले प्रश्न विचारू नयेत. परमवीर सिंह हे भाजपच्या पेरोलवर असणारे आधिकारी आहेत त्यामुळे कोणाला कोणाचा वाटा मिळत होता हे सर्वांना चांगले माहिती आहे. फडणवीस यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहरांची चौकशी करून ते गैरव्यवहार आता उघड करा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करीत आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्रातील भाजप सरकार अनेक बाबतीत नाकाम ठरले आहे. ती नाकामी लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून भाजपचे लोक असले गैरलागू विषय उपस्थित करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातील भाजपचे राज्यपालही पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही असा पलटवारही पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केला.