नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांमध्ये याच २७ मार्च रोजी मतदान होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात उतरलेला भाजप पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहे. तर दक्षिणेतील केरळमध्ये ६ एप्रिलला मतदान होणार आहे. केरळमधून भाजपला खूप अपेक्षा आहेत. मात्र भाजपच्या या अपेक्षांना पक्षातील नेतेचे सुरुंग लावताना दिसत आहेत.
केरळ भाजपमधील मोठे नेते आणि एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक विधान केलं आहे. त्यांचं विधान पक्षासाठी नुकसान करणारं ठरू शकतं. तसंच विरोधकांसाठी आयतं कोलीत ठरणार आहे. राजगोपाल म्हणाले की, केरळ इतर राज्यांपेक्षा वेगळं राज्य आहे. येथील सुशिक्षीत लोकांचं प्रमाण अधिक असल्यामुळे भाजपला लोक मतदान करत नाही.
केरळ वेगळं राज्य आहे. येथील साक्षरतेचं प्रमाण ९० टक्के आहे. राज्यातील लोक विचार करणारे असून तार्किक आहेत. शिक्षित लोकांच्या या सवयी आहेत. दुसरा फॅक्टर म्हणजे येथील ५५ टक्के लोक हिंदू तर ४५ टक्के लोक अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे केरळची तुलना इतर राज्यांसोबत होऊ शकत नाही. तरी आम्ही येथे चांगलं काम करत असल्याचे राजगोपाल यांनी नमूद केलं.