– अमित डोंगरे
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आता डीआरएसबाबत तोंड उघडले. या नियमातील किंवा प्रणालीतील पंचांचा कॉल (अम्पायर्स कॉल) आणि सॉफ्ट सिग्नल हे दोन मुख्य मुद्दे वादाचे ठरत आहेत. जर मैदानावरील पंच आपल्या निर्णयाबाबत ठाम नसतील तर तिसरा पंच निर्णय देतो. मग मैदानावरील पंचाचा कॉल महत्वाचा का ठरवण्यात येतो. ही प्रणाली अत्यंत अचूक व्हावी यासाठी आयसीसीने गांभीर्याने विचार व कारवाई करण्याची गरज आहे.
पंचांकडे अपील केल्यावर ते बाद किंवा नाबाद ठरवतात. त्यावर आक्षेप असेल तर दोन्ही संघांना डीआरएस घेता येतो. त्यात मैदानावरील पंच तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवतात. तिसरा पंच परिस्थीती व रीप्ले पाहून त्यावर निर्णय देतो. मात्र, यात एक त्रुटी सातत्याने दिसून येत आहे. ती म्हणजे मैदानावरील पंचांचा कॉल. पायचितचा निर्णय दिल्यावर त्याबाबत डीआरएस घेतला गेला तर तिसरा पंच मुख्य तीन मुद्दे विचारात घेतो.
चेंडूचा टप्पा, दीशा आणी फलंदाजाला चेंडू जीथे लागला तीथे न लागता चेंडू यष्टीवर गेला असता का. मात्र, जरी रिप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या समोरच फलंदाजाच्या पायाला लागला असेल, तसेच दीशा यष्ट्या उध्वस्त करणारी असेल तसेच चेंडूचा टप्पा ऑफ स्टम्पच्या समोरचीच असेल तर तो फलंदाज बाद दिला जातो. मात्र, त्यात मैदानावरील पंचाचा कॉल हा देखील एक निर्णायक मुद्दा येतो. जर मैदानावरील पंचाने नाबाद ठरवले असेल तर फलंदाज बाद दिला जात नाही, असे कित्येकदा घडलेले आहे. त्यामुळे जर मैदानावरील पंचाचाच निर्णय कायम ठेवला जाणार असेल तर त्या डीआरएसला काही अर्थच राहात नाही.
जेव्हा ही डीआरएस प्रणाली नव्हती तेव्हा मैदानावरील पंच बाद किंवा नाबाद ठरवत होते. त्याचा काही प्रमाणात तोटा होउ लागला व त्यातूनच डीआरएस प्रणाली निर्माण झाली. खरेतर क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) डीआरएसच नव्हे तर डकवर्थ-लुइससह अनेक असे अनाकलनीय नियम आजवर राबवलेले आहेत. अर्थात जागतिक क्रिकेटमध्ये डीआरएस जेव्हापासून आले तेव्हापासून भारताने त्याला विरोध केला होता. मात्र, फलंदाज बाद असतानाही अनेकदा पंचाचे निर्णय भारताच्या विरोधात गेल्यामुळे अखेर ही प्रणाली आपणही स्वीकारली. आता त्याचे तोटेही सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे ही प्रणाली अधिक सक्षम व परिपूर्ण व्हावी असे वाटत असेल तर त्यात अनेक बदल करावे लागतील. तसेच पंचांचा कॉल हा मुद्दाच निकाली काढला गेला पाहिजे.
तिसऱ्या पंचाने परिस्थिती व रिप्ले पाहुन काय तो निर्णय दिला पाहिजे. जर रिप्लेमध्ये चेंडू यष्टीला चाटून जरी जात असेल तरीही फलंदाजाला बाद दिले गेले पाहिजे. ज्या प्रकारे पंचांचा कॉल अर्थहिन आहे तसाच सॉफ्ट सिग्नलही एक डोकेदुखी ठरत आहे. कोणतीही नवी नियमावली किंवा प्रणाली लागू करताना त्याबाबत आपणच संभ्रमात असू तर प्रत्यक्ष निर्णयात अचुकता कशी येइल. या डीआरएसची मर्यादा अनेकदा उघडी पडलेली आहे.
काही वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये केवळ बीसीसीआयनेच या डीआरएसला विरोध करत तो स्वीकारलेला नव्हता. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड व व्हिव्हिएस लक्ष्मण या फॅब फाईव्हचा त्याला विरोध होता. त्यानंतर भारताविरुद्ध अनेकदा मैदानावरील पंचांनी अनेकदा वादग्रस्त निर्णय दिले होते. त्याचा सर्वाधिक तोटा भारतालाच झाला होता. अखेर बीसीसीआयने ही नियमावली स्वीकारली. मात्र, आजही ही प्रणाली परिपूर्ण नाही. येत्या काळात त्यात बदल व्हावा व अडचणीचे ठरत असलेले काही मुद्दे दूर व्हावेत तरच डीआरएस जास्त सक्षम ठरेल.