नवी दिल्ली – देशात करोना विरोधी लसींचा तुटवडा नाही. राज्यांनी मागणी केल्यावर त्यांचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लस प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जी काळजी घेणे आवश्यक आहे ती घेतली जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर डोस वाया जात असल्याच्या बातम्या असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लस वाया घालवण्याचे प्रमाण सगळ्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे. आंध्र प्रदेशला एकूण लसीचे जे डोस देण्यात आले होते, त्यापैकी 11. 6 टक्के डोस निर्धारीत वेळेत दिले न गेल्यामुळे वाया गेले आहेत. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर तेलंगणा आहे. या राज्याला पुरवठा करण्यात आलेल्या लसींपैकी 17.6 टक्के लसी त्यांनी वाया घालवल्या आहेत.
तीसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून येथे लस वाया घालवण्याचे प्रमाण 9.4 टक्के आहे. त्यानंतर कर्नाटक आणि जम्मू काश्मीरचा नंबर लागतो. या राज्यांनीही सहा ते साडेसहा टक्क्यांपर्यंत डोस वाया घालवले आहेत.
अन्य राज्यांतही लस योग्य निगा राखली जात नसल्यामुळे व निर्धारीत वेळेत दिली जात नसल्यामुळे बाद होते आहे. याबद्दल पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली असून सर्व राज्यांनी योग्य खबरदारी घेऊन योग्य व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.