कोल्हापूर – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणामुळं राज्याचं राजकारण तापलं आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यातच आता सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा सायंकाळपर्यंत राजीनामा येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या सरकारमधील संजय राठोड या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दुसरे मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, तर तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील असे भाकित पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी संबंधीत मंत्र्याचं नाव पाटील यांना विचारण्यात आलं. मात्र त्यांनी वेट अँड वॉच असं म्हणत उत्तर देण्याचं टाळलं. तसेच स्फोटकं प्रकरण हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरुद्ध पुरावे असताना देखील सरकारने कारवाई केली नसल्याचं पाटील यांनी म्हटलं.