मुंबई – महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर देण्याची सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी केली. गेल्या आठवड्यात केंद्रीय पथकाने महाराष्ट्राला भेट दिल्यानंतर त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहले आहे.
महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या साथीची सुरवात झाली आहे. त्यामुळे शोध, चाचणी आणि बाधितांचे अलगीकरण आणि संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण मर्यादित स्वरूपात होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही नागरिकांची वर्तणूक ही करोनाचे निर्बंध पाळणारी नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे भूषण यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण राज्यात 1:20 आहे. सकृतदर्शनी हे प्रमाण खूप जास्त वाटत असले तरी प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपर्कातील व्यक्ती ही संकल्पना पुरेशा स्पष्टपणे समजली नाही. त्यामुळे ते कुटुंबातील व्यक्ती आणि शेजाऱ्यांचा संपर्क म्हणून उल्लेख करत आहेत, अशी पुस्तीही त्यात जोडली आहे.
रात्रीची संचारबंदी, अंशत: लॉकडाऊन, सुटीच्या दिवशीचे लॉकडाऊन इत्यादी उपाय योजनांचा प्रभाव मर्यादित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी केंद्राच्या सुचनांप्रमाणे करावी, असे त्यात म्हटले आहे.
राज्यात पॉझिटिव्हिटी प्रमाण 13.21 टक्के आहे. बरे होण्याचे प्रमाण 92.81 टक्के आहे. तर मृत्यू दर 2. 28 टक्के आहे हा दर साथीच्या सुरवातीपासूनच्या आकडेवारीवर आधारित आहे. राज्यात लातूर जिल्हा प्रशासनाने रात्री आठ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जारी केली आहे. सर्व आठवडे बाजारात 31 मार्च पर्यंत तेथे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तर नागपूर शजहरात 15 ते 21 मार्च पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे.