नवी दिल्ली – कॉंग्रेसमध्ये तरुणांवर खूप जास्त लक्ष्य केंद्रित करणे ही आपली चूक असल्याचे नमूद करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी ते आता ट्रॅक बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत. युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात विश्वास, निष्ठा आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याच्या मुद्द्यावरही भर दिला.
कॉंग्रेसच्या विचारसरणीशी बांधिल लोकांना अधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. विशेष म्हणजे आगामी काळात जूनमध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यावेळी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळेच अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टीम राहुलमध्ये कोण असणार यासाठीचा सूचक इशारा राहुल गांधींनी दिला असल्याचे मानले जाते आहे.
राहुल गांधी यांनी 2004 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला तिकिट देण्यापासून विविध प्रमुख विभाग आणि पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये तरुणांना संधी देण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले. कॉंग्रेसमध्ये तरुणांचा भरणा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही बोलले गेले. त्यासाठी त्यांचे कौतुकही झाले. मात्र, मध्यंतरीच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या युवा नेत्यांच्या बंडखोरीनंतर राहुल गांधी यांनी आपला पवित्रा बदलल्याची चर्चा आहे. तसेच पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातील घडामोडींबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी त्यांनी जम्मूत एक स्वतंत्र कार्यक्रमही ठेवला होता. हा सगळा घटनाक्रम कॉंग्रेस पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाला बदल स्विकारण्यास भाग पाडत असल्याचे मानले जाते आहे.