अहमदाबाद – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विजयानंतर या सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीबाबत एकही टिकेचा शब्द काढला नाही. मात्र, या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने शेलक्या शब्दात टीका केली आहे. त्याने आयसीसी व बीसीसीआयवरही ताशेरे मारले आहेत.
ही खेळपट्टी कसोटीसाठी नव्हतीच असे ठामपणे वाटते. यावर चेंडू कसा फिरकी घेईल याचा अंदाजही येत नव्हता. दोन्ही संघांच्या फलंदाजांचे बाद होणे पाहिल्यावर या खेळपट्टीला तयार करताना नक्की कोणता विचार करण्यात आला असावा याचेही आश्चर्य वाटते. या कसोटीचा निकाल लागणार हे पहिल्याच दिवशी खेळपट्टी पाहिल्यावरच लक्षात आले होते. मात्र, इतक्या नीचांकी धावसंख्येचा सामना होईल ही अपेक्षा कोणीही केली नव्हती, असे रूटने सांगितले.
कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्टी तयार करताना काहीतरी संकेत असावेत. खेळपट्टी तयार केल्यावर त्याचे अवलोकन अनुभवी तज्ज्ञांकडून केले जावे व त्यात आयसीसीने पुढाकार घ्यायला हवा. कसोटी क्रिकेट जीवंत ठेवायचे असेल तर आयसीसीला याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बीसीसीआयने देखील याबाबत विचार करणे गरजेचे आहे. मी काही भेदक गोलंदाज नाही हे मलाही माहिती आहे तरीही मी या सामन्यात 5 गडी बाद करु शकलो यावरुन या खेळपट्टीचा दर्जा लक्षात येऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात याबाबत अनुकुल विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे, असेही मत रूटने व्यक्त केले.
तिसरा कसोटी सामना गमावला असला तरीही चौथ्या सामन्यात निश्चितच आम्ही यशस्वी पुनरागमन करु. संघातील फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळताना जास्त तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागणार आहे. जॅक लीचकडून चौथ्या कसोटीत जास्त अपेक्षा आहेत. त्याने या मालिकेत सातत्याने सरस गोलंदाजी केली असून भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना बाद करण्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, असेही रूटने सांगितले.