लंडन, – पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या युकेमध्ये असून तिथल्या न्यायालयाने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण होणार आहे. मात्र, असे करतानाच युकेमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश सॅम गूझी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांना देखील सुनावले आहे.
भारतीय न्यायव्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून नीरव मोदीला भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळणार नाही, असा दावा मार्कंडेय काटजू यांनी केला होता. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या सुनावणीदरम्यान ब्रिटनमधल्या न्यायालयात काटजूंनी तज्ज्ञ म्हणून आपली भूमिका मांडली होती.
माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनी आपल्या भूमिकेमध्ये भाजप सरकारची तुलना हिटलरशी केली होती.
भाजप सरकार भारतातल्या आर्थिक समस्या सोडवू न शकल्यामुळेच हा सगळा आरोप नीरव मोदीवर टाकला जात आहे. हे हिटलर आणि ज्यूंसारखं आहे. नीरव मोदींना ज्यूंप्रमाणेच भारतातल्या सर्व समस्यांसाठी जबाबदार धरलं जात आहे. जर मोदींचे भारतात प्रत्यार्पण झाले, तर भारतीय न्यायव्यवस्थेत त्यांना न्याय मिळणार नाही, कारण भ्रष्टाचाराने भारतीय न्यायव्यवस्था पोखरली गेली आहे, असे मत काटजूंनी ब्रिटनच्या न्यायालयात मांडले होते.