नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारसोबतच न्याययंत्रणेलाही लक्ष्य केले असून भारतात उलटी गंगा वाहत असल्याचा बोचरा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे.
देशात इखलाख, पहलू खान आणि तबरेज आणि अन्सारी यांच्या जमावाकडून हत्या झाल्या. त्यांच्या मारेकऱ्यांऐवजी मृतांच्या कुटुंबियांवरच कोर्टात खटले सुरू आहेत. निर्दोष सफुरा जरगर, काफिल खान आणि शार्जिल इमाम यांना तुरूंगात टाकण्यात आले आहे. मात्र धार्मिक हिंसाचार करणारे कपिल शर्मा आणि अनुराग ठाकुर बाहेर आहेत. हे सगळे प्रकार होत असताना सर्वोच्च न्यायालयानेही आपले डोळे बंद करून ठेवले आहेत, अशी टीका काटजू यांनी केली आहे.
सफूरा जरगर हे जामिया मिल्लीया इस्लामियातील पीएचडीचे स्कॉलर असून दिल्लीत काही काळापूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. तर शार्जिल इमाम हा जेएनयूचा माजी विद्यार्थी असून देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून त्यालाही अटक करण्यात आली आहे.
माजी न्यायाधीश असलेले काटजू हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द आहेत. गेल्या काही काळात ते केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. अगोदर त्यांनी स्थलांतरित मजुरांच्या विषयावरून व त्यानंतर चीनने भारताचा भूभाग बळकावल्याच्या मुद्दयावरून सरकारवर तोफ डागली होती. अमेरिकेच्या एका आयोगाच्या सदस्यांना अलिकडेच केंद्र सरकारने भारत भेटीची परवानगी नाकारली आहे, त्यावरूनही काटजू यांनी सरकारवर टीका केली आहे.