येरवडा – येरवडा तारकेश्वर डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या घरांवर डोंगराच्या दरडी कोसळत आहेत. रात्री एकच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र, दोन-चार दिवसांनी या दरडी कोसळत असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबत कळविण्यात आल्यानंतरही प्रशासाकडून काहीही कार्यवाही होत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तारकेश्वर डोंगराच्या मागील बाजुला नुर ए इलाही संभाजी चौकाच्या मागील बाजुला पायथ्याला अनेक कुटुंब वर्षानुवर्ष राहत आहेत. मागील वर्षी डोंगर माथ्यावरील भाग कोसळला होता, त्यावेळी जीवितहानी झाली नाही. मात्र, दारासमोरच मोठमोठे दगड पडल्याने अनेक कुटुंब इतरत्र गेली आहेत.
या डोंगराचा अजुनही काही भाग धोकादायक स्थितीत असून दगड कोसळत आहेत. यामुळे येथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना जीव मुठीत घेऊन राहवे लागत आहे. याबाबत नगरसेवक तसेच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह विभाग क्षेत्रीय कार्यालयाचेही दुर्लक्ष आहे.
डोंगराच्या बाजूने संरक्षित जाळ्या लावून डोंगराला गनायटिंग करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एजाज खान तौसीफ कुरेशी, जनार्दन कुसळे आणि आसिफ शेख यांनी केली आहे.
डोंगराचे दगड कोसळण्याबाबतच्या घटनासंदर्भात किंवा संरक्षण यंत्रणेबाबतचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नसल्याने कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तहसीलदारांमार्फतही प्रस्ताव यावा लागतो. मात्र, तो ही अजून आलेला नाही.
– गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख