संकलन – संजय कडू
पुणे – कारागृहात गेला म्हणजे एखाद्या कैद्यावर आजीवन गुन्हेगारीचा शिक्का बसतो. पण, तो पुसला जावा आणि ती व्यक्ती शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा “माणूस’ म्हणून समाजात मोकळेपणाने वावरू शकेल, अशा काही ठोस उपाययोजना राज्याच्या कारागृह विभागातर्फे राबविण्यात येत आहेत. यात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा श्री. अमिताभ गुप्ता यांच्या पुढाकाराने अनेक योजना राबवून कारागृहाचे वातावरणदेखील पूर्णपणे बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा श्री. अमिताभ गुप्ता यांच्या मते, “कारागृहांतील कैद्यांना कायद्यानुसार ज्या सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे, त्या दिल्याच गेल्या पाहिजेत. कायद्यानुसार ज्या सोयीसुविधा देण्यावर बंधने आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.’ या नियमांचे पालन करत कारागृहांच्या वातावरणात लक्षणीय बदल केले जात आहेत.
कारागृहांत अपराधी हे बंदिवान म्हणून येतात. सुधारणा घडवून त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा कसे पाठवता येईल, यासाठी कारागृह विभाग फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळेच कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य “सुधारणा व पुनर्वसन’ असे आहे. यासाठी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक श्री. अमिताभ गुप्ता यांनी कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांचे अधीक्षक यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे ब्रीदवाक्यानुसार ही कारागृहे न राहता सुधारगृहे व्हावीत, अशी विभागाची वाटचाल श्री. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दगडी भिंती-लोखंडे सळ्या न्हवे तर… दर्जेदार उत्पादनांचे हब्बा…
कैद्यांना मिळणार गरम पाणी, अतिरिक्त चादर व उशी
एकदा हिवाळ्यात श्री. अमिताभ गुप्ता यांनी कारागृहांस भेट दिली होती. त्यावेळी अनेक कैद्यांनी कडाक्याच्या थंडीत आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होण्याबाबत विनंती केली होती. त्यावर श्री. गुप्ता यांनी तातडीने निर्णय घेत बंद्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करण्याबाबत सर्व कारागृह अधीक्षकांना सूचित केले. तसेच थंडीच्या काळात अतिरिक्त चादर व उशीही उपलब्ध करून देण्यात आल्या. बंद्यांच्या भेटीसाठी कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, हे लक्षात घेऊन त्यासाठी सर्व बंद्यांच्या मुलाखती वेळेत पूर्ण होण्यासाठी मुलाखतसाठीच्या खिडकी आणि कॉइन बॉक्सही वाढविण्यात आले.
कारागृहाची उत्पादने ऑनलाइन, “ऍमेझॉन’शी चर्चा सुरू
कारागृहात उपक्रमांद्वारे बंद्यांना कौशल्याने सुसज्ज करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना काम मिळेल. कारागृहातील उत्पादनांचा एक सक्षम “ब्रॅंड’ बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ही उत्पादने ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होतील, असे प्रयत्नही करण्यात आले. यासाठी ऍमेझॉन व इतर ऑनलाइन व्यापारी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती श्री. अमिताभ गुप्ता यांनी दिली. येरवडा कारागृह विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या इतर उत्पादन युनिट्स आणि सेवांमध्ये पॉवरलूम, हातमाग, टेलरिंग, लेदर वर्क, पेपर फॅक्टरी, लॉन्ड्री आणि बेकरी उत्पादने यांचा समावेश आहे. तुरुंगाच्या आउटलेटवर विविध लाकूड उत्पादने, कोल्हापुरी चामड्याची चप्पल आणि बेकरी उत्पादने उपलब्ध आहेत आणि ती खूप लोकप्रिय आहेत.
मनुष्यबळाचा योग्य उपयोग
येरवडा हे राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या कारागृहांपैकी एक आहे. हे अधिकृतपणे 2,449 कैद्यांना सामावून घेऊ शकते. सध्या दोषी आणि “अंडरट्रायल’सह तब्बल 5,996 कैदी येथे दाखल आहेत. इतर कारागृहांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. कारण, महाराष्ट्रातील सर्व कारागृहांमधील तुरुंगातील लोकसंख्येचा सरासरी भोगवटा दर 169 टक्के आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून तो उच्च आहे. कारागृह नियमावलीनुसार, विविध व्यवसायांसाठी काम करणाऱ्या कुशल कैद्यांना त्यांच्या कामासाठी 67 रुपये, अर्धकुशल 61 रुपये आणि अकुशल 48 रुपये प्रतिदिन मानधन दिले जाते. राज्यभरातील तुरुंगांमध्ये 58 टक्के पुरुष कैदी देखभाल-दुरुस्तीत गुंतलेले आहेत. महिलांमध्ये कार्यरत कैद्यांची संख्या 26 टक्के आहे. तुरूंग विभागासह त्यांचा व्यवसाय चालविण्यासाठी युनिट्सना उत्पादन-प्रशिक्षण दृष्टिकोनासह काम करण्याची परवानगी आहे. कैद्यांनी बनवलेली ही उत्पादने दर्जेदार आणि स्वस्त असतात. यामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कारागृह प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
कोट्यवधी रुपयांचे योगदान
राज्य कारागृह विभागाच्या आकडेवारीनुसार, येरवडा कारागृहात 2021-22 या आर्थिक वर्षात बंद्यांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे 2 कोटी 99 लाख रुपयांची रुपयांची कमाई केली आहे. अमरावती कारागृहाने 1.77 कोटी रु., नाशिकरोड कारागृह 1.72 कोटी रु. आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहाने 1.54 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
कारागृह आले “नन्हे कदम’
महाराष्ट्र कारागृह विभागात प्रथमच “नन्हे कदम’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यात सर्वप्रथम भायखळा जिल्हा कारागृह परिसरात कारागृहाबाहेर महिला बंदिजन आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी “नन्हे कदम’ हा बालवाडी विभाग आणि हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सामाजिक दृष्टीने पाहता, हा उपक्रम क्रांतिकारी ठरणार आहे. भायखळा जिल्हा कारागृहामध्ये सरासरी 350 महिला बंदी असतात. यामध्ये 0 ते 6 वयोगटातील जवळपास 14 ते 15 लहान मुले त्यांच्या आईसोबत कारागृहात असतात.
या लहान मुलांना दररोज कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या भविष्याला उज्ज्वल आणि योग्य दिशा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास कार्यक्रमांतर्गत या चिमुकल्यांना शिक्षण देण्यासाठी महिला सेवक आणि मदतनिसांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत बंद्यांच्या लहान मुलांना शिक्षण दिले जाते. आता मुंबई जिल्हा महिला कारागृह व “आंगनी’ या संस्थांच्या विद्यमाने “नन्हे कदम’ बालवाडी व हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे महिला बंद्यांच्या मुलांसोबतच कारागृह विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था निर्माण होत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
राज्यात 8 ठिकाणी उपक्रम
“वर्किंग वुमन’समोर कामाच्या वेळेत त्यांच्या लहानग्यांना सांभाळण्याचा यक्षप्रश्नच असतो; परंतु यापुढे भायखळा कारागृहाच्या महिला कर्मचारी यांना या गोष्टीची चिंता भासणार नाही. हाच उपक्रम राज्यातील इतर 8 कारागृहांतही लवकरच राबविण्यात येत आहे.
“दूर’ध्वनी सुविधा झाली “जवळ’
राज्यातील कारागृहांतील बंदिजनांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. अशावेळी कैद्यांमध्ये मानसिक ताणतणाव आणि पुढे पर्यायाने नैराश्य वाढू शकते. यासाठी सन 2014 पासून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधेची उपाययोजना करण्यात आलेली आहे. ही सुविधा वापरण्यासाठी कैद्यांना आपल्या नातेवाइकांचे दूरध्वनी क्रमांक कारागृह प्रशासनाकडे द्यावे लागतात. पोलीस प्रशासनाकडून त्याची तपासणी आणि खात्री करूनच कार्यवाही करण्यात येते. बंदी व त्यांचे जवळचे नातेवाईक (ब्लड रिलेटिव्हज) यांचा संपर्क कारागृह नियमांनुसार सुरू असताना कारागृहातील अति गर्दी, कोविड-19 सारखे संसर्गजन्य आजार यामुळे अनेकदा अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत असतो. यामुळे दूरध्वनी सेवेत सुलभता येणे आवश्यक होते. यावर अमिताभ गुप्ता यांनी लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांनी राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना तसे आदेशही दिले.
यामध्ये ज्या बंद्यांचे नातेवाईक भेटीस येत नाहीत, अशाच किंवा क्वचितच मुलाखत होते अशाच बंद्यांना महिन्यातून 3 वेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी 10 मिनिटे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दि. 14 जून 2017 च्या शासन परिपत्रकानुसार कारागृहातील ज्या बंद्यांच्या वकील भेटीबाबत सकाळी 9 ते 10:30 ही वेळ देण्याबाबत कार्यवाही केली जाते, त्यांना वगळून ज्या बंद्यांचे वकील समक्ष भेटीस येत नाहीत अशाच बंद्यांना महिन्यातून 2 वेळा प्रत्येकी 10 मिनिटे दूरध्वनी सुविधा देण्यात यावी, असे आदेश दिले. याबरोबरच स्थानिक परिस्थितीनुसार वकील भेटीबाबत कारागृह अधीक्षकांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारही श्री. गुप्ता यांनी प्रदान केले आहेत.
बंदी क्षमता वाढवली
विविध गंभीर गुन्ह्यांत उदा. संघटित गुन्हेगारी, देशविघातक, दहशतवादी कारवाया, नक्षलवादी, एनडीपीएस (अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा) बलात्कार प्रकरणातील गुन्हे, व्यावसायिक खुनी व इतर अतिगंभीर गुन्ह्यांतील बंदी वगळता
1 वर्षांवरील शिक्षा झालेल्या सर्व बंद्यांना निव्वळ 1 वर्ष किंवा जन्मठेपेच्या बाबतीत 5 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर खुल्या कारागृहात वर्ग करण्यात येते. येथे कैद्याने एक महिना शिक्षा भोगल्यानंतर 30 दिवस सर्वसाधारण माफी देण्यात येते. बंद्यांची व नातेवाईकांची भेट प्रत्यक्ष समोरासमोर देण्यात येते.
तसेच बंद्यांना खुल्या कारागृहाच्या शेती, कारखाना विभागात काम दिले जाते. बंदी मोकळ्या हवेत शिक्षा भोगत असल्याने त्यांचे जीवनमान सुधारते. सध्या राज्यात 19 खुली कारागृहे असून तेथे 1,512 पुरुष व 100 महिला कैदी ठेवता येतील, इतकी त्यांची क्षमता आहे. सन 2022 मध्ये खुले कारागृहासाठी पात्र असलेल्या 1,571 पुरुष व 45 महिला बंदींना खुल्या कारागृहासाठी पात्र करण्यात आले होते; परंतु सर्वच ठिकाणच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेता, बरेच बंदी खुल्या कारागृहात जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये खुल्या कारागृहाची बंदी क्षमता साधारणपणे 20 टक्क्यांनी वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय नुकताच घेण्यात आला.
खुल्या कारागृहाबाबत नवी धोरणे
भादंवि 392 ते 402 कलमांमध्ये शिक्षा सुनावलेल्या कैद्यांची त्या कलमातील शिक्षा संपल्यानंतर त्यांना खुले कारागृहासाठी पात्र केले जाईल. उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बंद्यांना खुले कारागृहात वर्ग केले जाणार. वय 60 तसेच त्यावरील वयस्कर बंद्यांना खुल्या कारागृहात वर्ग करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय तपासणी आणि दर्जेदार पदार्थ
कारागृहातील सर्व बंद्यांची वैद्यकीय चाचणी, रक्तचाचणी, ईसीजी, शुगर, युरिन इत्यादी पूर्ण तपासण्या गरजेनुसार आणि सातत्याने केल्या जात आहेत. ज्या बंद्यांना हृदयविकार, टीबी आणि एड्ससारखे आजार आहेत; अशांच्या आरोग्याकडे सेवाभावी संस्था, “सीएसआर’ किंवा जिल्हा रुग्णालय यांचे मदतीने अधिक लक्ष दिले जाते. कैद्यांच्या आहारातील अन्नधान्य हे खाण्यायोग्य असल्याची खात्री केली जाते. तसेच कारागृह उपहारगृहातून (कॅंटिन) ज्या खाद्योपयोगी वस्तू विकल्या जातात, त्यांचा दर्जा चांगला दर्जा राखला जात आहे.
…आणि एका निर्णयाने थांबली नातेवाइकांची प्रवासाची फरफट
महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या दक्षिण (मुंबई) विभागांतर्गत बंद्यांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावल्यानंतर वर्गवारी नियमानुसार राज्यातील इतर कारागृहांकडे वर्ग केले जात होते. ही कार्यवाही कारागृह मुख्यालयाच्या परिपत्रकानुसार करण्यात येत होती. जे बंदी मुंबई येथून नागपूर, अमरावती येथे वर्ग केले जात होते, त्यांच्या नातेवाइकांना बंद्याच्या भेटीसाठी (मुलाखत) तब्बल 700 ते 800 किलोमीटर प्रवास करून जावे लागत होते.
यामुळे निष्कारण दूरचा प्रवास, खर्च आणि वेळही वाया जात होता. या सर्व गोष्टींचा प्रथम विचार श्री. अमिताभ गुप्ता यांनी केला. बंदी आणि नातेवाइकांचा संवाद सुलभ व्हावा, यासाठी त्यांनी मुंबई विभागातील कारागृहातील शिक्षा लागलेल्या शिक्षाधीन बंद्यांना नागपूर व अमरावती कारागृहात वर्ग न करता कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक कारागृहात वर्ग करण्याबाबत कारागृह अधीक्षकांना आदेश दिले आहेत. यामुळे आता कैद्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना सहजतेने जाणे-येणे शक्य होत आहे.
संशोधनासाठी खुले झाले कारागृहाचे द्वार
मानवी वर्तवणुकीचा अभ्यास करण्यासाठी विविध गटांतील अभ्यासक आणि विद्यार्थी हे सामाजिक संशोधनाचा वापर करतात. तसे पाहता, सामाजिक संशोधन म्हणजे कठीण विषय. कारण, मानवी वर्तनाबद्दल कोणीही सहज अंदाज लावू शकत नाही; परंतु सामाजिक संशोधनांमुळे मानवी व्यवहार आणि समाजासंदर्भात बऱ्याच गोष्टींचा उहापोह निश्चित होऊ शकतो. हा विचार करून अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक श्री. अमिताभ गुप्ता यांनी कारागृह आणि संशोधक विद्यार्थ्यांसंबंधी काही आश्वासक पावले उचलली आहेत.
विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी विशेषतः लॉ (कायदा), एमएसडब्ल्यू (समाजकार्य पदव्युतर पदवी) अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृहांना भेट द्यावी लागते. विविध विषयांवर महाराष्ट्रातील तसेच देशातील विद्यापीठामार्फत संशोधन करण्यात येते. कारागृहातील बंद्यांवरदेखील संशोधन करण्यासाठी हे विद्यार्थी आपला संशोधन विषय निवडत असतात. यासाठी त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील बंद्यांच्या माहितीची आवश्यकता भासते.
ही सामाजिक आणि विशेषत: शैक्षणिक बाब लक्षात घेऊन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा श्री. अमिताभ गुप्ता यांनी नोंदणीकृत संस्था आणि शासनमान्य विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनासाठी कारागृहभेटीची परवानगी देण्याबाबत आदेश नुकतेच दिले. यामध्ये त्यांनी काही अटीदेखील लागू केल्या. यात प्रामुख्याने कारागृह सुरक्षा लक्षात घेता आक्षेपार्ह विषय आणि संबंधित बाबींवर संशोधन करता येणार नाही. तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी मोलाची मदत होत आहे.
तीन नव्या कारागृहांना मान्यता
राज्यातील कारागृहांत कैद्यांची वाढती संख्या पाहता, श्री. अमिताभ गुप्ता यांनी राज्यात आठ नवीन करागृह सुरू करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे दिले होते. यामध्ये येरवडा, मुंबईत मानखुर्द-तुर्भे, पालघर, नारायणडोह-अहमदनगर, हिंगोली, गोंदिया, भुसावळ आणि बारामती या ठिकाणांचा समावेश होता. यापैकी तीन ठिकाणी मुंबईत मानखुर्द, पालघर आणि नारायणडोह-अहमदनगर येथे नवीन कारागृह उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील इमारत आणि भौतिक सुविधा उभारणीचे काम पूर्ण होताच, अन्य ठिकाणचे कैदी या तीन ठिकाणी वर्ग केले जातील. त्यामुळे अन्य ठिकाणचा प्रशासकीय ताणही कमी होण्यास मदत मिळणार आहे.
संशोधकांना नवीन ज्ञान
या संशोधनाद्वारे या विद्यार्थ्यांना कारागृह बंद्यांच्या समस्या, मानसिक स्थितीचा अभ्यास आदींबाबत अभ्यास करता येणार आहे. यामुळे देखील संशोधकांना एका नवीन विषयाचे ज्ञान प्राप्त होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कारागृह भेटीचे फायदे
कारागृह भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार बंद्यांच्या विविध सुधारणा व पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती मिळणार या क्षेत्रभेटींमुळे समाजकार्य विषयांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या क्षेत्रभेटींमुळे ज्ञानवृद्धी होणार कारागृहातील बंद्यांना कायदेविषयक सहाय्य करण्यासाठी विधी व्यवसायावेळी या भेटीचा ते भविष्यात उपयोग करू शकतील.
कारागृहात कौशल्ये शिकल्यानंतर येथील कैदी त्यांच्या पूर्वीच्या आयुष्याचा त्याग करून समाजात चांगले माणूस म्हणून पुढे जातील. कैद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्याकडे आणखी काही योजना आहेत, ज्यांची अंमलबजावणी केली जात आहे.
– अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य