सांगली – महाविकास आघाडी पॅटर्न आता अनेक जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे चित्र आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सांगली महापालिकेतील विजय म्हणजे महाविकास आघाडीतील एकजुटीचे प्रतीक आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटाळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
महापौर पदाच्या मतदानात ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे.