मुंबई – भारतातील शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर गेल्यानंतर कालपासून गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. काल शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यानंतर आज बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत राहिल्या. बाजार बंद होताना निर्देशांकामध्ये थोडीफार वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 7 अंकांनी कमी होऊन 49,751 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 32 अंकांनी वाढून 14,707 अंकांवर बंद झाला.
ओएनजीसी, इंडसइंड बॅंक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बॅंक, टायटन या कंपन्यांना खरेदीचा फायदा झाला. तर कोटक बॅंक, मारुती, बजाज ऑटो, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला.
आजच्या पडत्या काळातही रिऍल्टी आणि धातू क्षेत्राच्या काउंटरवर खरेदी झाली, असे रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले. सरकारी रोख्यातील परतावा वाढत असल्यामुळे कालपासून गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत.
त्याचबरोबर कमोडीटीचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. आशिया युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याचे दिसून आले. असे होत असतानाच क्रुडचे दर मात्र हा 65 डॉलर प्रती पिंपावर गेले आहेत.