-ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
जरी हृदयीं विषय स्मरती। तरी निसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ।।
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह
जाणें ।।
माऊली म्हणतात, मनात विषयांची फक्त आठवण जरी झाली तरी सर्वसंग परित्याग केलेल्या पुरुषाला आसक्ती निर्माण होते. नंतर विषयासक्तीमुळे काम आकार घेतो. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले स्थान आधीच निश्चित केलेले असते आणि क्रोधामुळे बुद्धी अविवेक संपन्न होते.
ज्याप्रमाणे वादळी वाऱ्याने दिवा विझून जातो त्याप्रमाणे बुद्धी अविवेकी झाली की उपदेश स्मृती नष्ट होते. त्यामुळेच क्रोधात असताना व्यक्तीची अविवेकामुळे सारासार विचार करण्याची बुद्धी लोप पावते आणि गुरूंच्या उपदेशांचा विसर पडतो. त्याक्षणी उचललेले चुकीचे पाऊल कधीही न भरून येणाऱ्या दुःखाला आणि पश्चातापाला कारण होते.