कुटुंब नियोजनाची पथ्ये
नवी दिल्ली, ता. 14 – सहाव्या आंतरराष्ट्रीय कुटुंबनियोजन परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नेहरू म्हणाले, “भारतात लोकसंख्येला आळा घालणे ही एक तातडीची गोष्ट होऊन बसली आहे. परंतु कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम परिणामकारक होण्यासाठी देशाची आर्थिक व सामाजिक प्रगतीही त्याचवेळी झाली पाहिजे. ही गोष्ट जर आपण दृष्टीआड केली तर आपला सर्व कार्यक्रमच अस्थिर पायावर उभारला जाईल. भारतानेच प्रथम सरकारीरीत्या कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम स्वीकारला आहे, याबद्दल मला संतोष वाटतो.’
मद्रास राज्यातील जननसंख्या घटणार
मद्रास – मद्रास राज्यात कुटुंब नियोजनाची योजना कार्यवाहीत आणली गेल्यामुळे येत्या काही महिन्यांत राज्यातील जननसंख्या पुष्कळच कमी होईल, असा अंदाज मद्रासचे आरोग्यमंत्री माणिक वेलू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, आतापर्यंत सुमारे 2000 लोकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 12000 वर अपत्ये कमी जन्माला येतील.
काश्मीरला भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कक्षेत आणा
नवी दिल्ली – भारताच्या सर्वोच्च न्यालयाची अधिकार-कक्षा सर्व काश्मीरभर पूर्णपणे विस्तारित करावी अशी मागणी जम्मू आणि काश्मीर प्रजा परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ डोग्रा यांनी केली आहे. पत्रपंडितांना दिलेल्या मुलाखतीत डोग्रा म्हणाले, की राज्यातील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका रद्द करून उच्च न्यायालयीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नव्या निवडणुका घ्याव्यात. काश्मीरमधील निवडणुका कमिशनरच्या देखरेखीखाली व्हाव्यात.
बचत करणे हाच आजचा समाज धर्म
पुणे – “आपल्या मिळकतीतील काही बचत करणे हाच आजच्या युगातील समाज धर्म असून त्याचे प्रतिपालन समाजाच्या स्थैर्याकरिता आवश्यक आहे,’ असे उद्गार डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी आज रोजी पुण्यातील अल्पबचत योजना पंधरवड्याचे उद्घाटन टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणेच्या सभागृहात करताना काढले.