औंध वार्ताहर
बाणेर येथे पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांकडून एक अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मशाली पेटवून , व विद्युत खांबांना मशाली बांधून मशाल आंदोलन करण्यात आले.
बाणेर-सुस-म्हाळुंगे शिवे (बेलाकसा सोसायटी ते पाडळे वस्ती) मेन रोडवरील लाईटच्या खांबांवरील स्ट्रीट लाईट गेली अनेक वर्षे बंद आहेत. रस्त्यावरील अंधारामुळे महिला, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. बाणेर-बालेवाडी हा पुणे शहरातील स्मार्ट भाग आहे आणि अश्या परिसरात रस्त्यांवरील लाईट सारख्या मुलभूत सुविधांचाही अभाव आहे. या भागात बहुसंख्य नागरिक हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक वेळा नाईट शिफ्ट्स ला जाणे-येणे या मार्गाने होते, अश्या वेळी स्ट्रीट लाईट्स नसल्यामुळे सुरक्षिततेचा मोठा धोका निर्माण झाला आहे परंतु प्रभागातील चारही नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेल्या वचनांचा लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे. येथील स्ट्रीट लाईट्सला लवकरात लवकर कनेक्शन देऊन अथवा बंद पडलेल्या लाईट्स बदलुन येथील स्ट्रीट लाईट्सचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या मागणीसाठी “मशाल आंदोलन” करण्यात आले असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
बाणेर सारखा भाग हा स्मार्ट सिटीमधील मानबिंदु आहे, अश्या भागांत स्ट्रीट लाईट्स चा अभाव आणि परिणामी माता-भगिनींच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे आणि रस्त्यांवर मशाल घेऊन नागरिकांसाठी प्रकाशाचा पर्याय निर्माण करणे हे स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेचे फळ आहे. पुणे महानगरपालिका व सर्व पक्षीय स्थानिक नगरसेवकांनी सदरील भागातील स्ट्रीट लाईट्स पुढील चार दिवसांमध्ये सुरू करून परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबवावी अन्यथा या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे लहु बालवडकर यांनी सांगितले.