इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारच्याविरोधात स्थापन झालेल्या “पाकिस्तान डेमोक्रॅट मुव्हमेंट’ने आता अधिक आक्रमक रणनिती आखली आहे. पाकिस्तानमधील सिनेटच्या निवडणूका लढवणे, सरकारविरोधात विराट मोर्चा काढणे आणि सरकारविरोधात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्यावतीने अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय “पीडीपी’ने घेतला आहे.
“पीडीपी’चे नेते मौलाना फजलूर रेहमान आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार सरकारविरोधातील लढ्यात पीएमएल-एन गट पूर्ण शक्तीनिशी उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
“पीडीएम’च्या नवीन रणनितीचा केंद्रबिंदू हा सिनेटच्या निवडणूका आणि “पीपीपी’कडून सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणे हा असणार आहे. या दोन्ही मुद्दयांवर आज अंतिम निर्णय होणार आहे. या संदर्भात मौलाना फझलूर रेहमान यांनी सुचवलेल्या प्रस्तावांना नवाझ शरीफ यांनी पूर्ण सहमती दर्शवली आहे.
मौलाना फझलूर रेहमान यांच्या निवासस्थानी तब्बल 6 तास झालेल्या जमियत उलेमा ए इस्लाम फझी या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर शरीफ यांच्याबरोबरच्या फोनवरील चर्चेची माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर “पीएमएल-एन’च्या नेत्या मरियम नवाझ या पक्षाच्या अन्य नेत्यांसह फझी यांच्या फझी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि अधिक सविस्तर चर्चा केली.
पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार म्हणजे पाकिस्तानला धोका झाला असल्याचे “पीएमएल-एन’चे नेते अहसान इक्बाल यांनी म्हटले होते. इम्रान खान यांच्या सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि विदेशनिती पूर्णपणे कोसळली आहे, असेही इक्बाल म्हणाले होते.
11 पक्षांची आघाडी असलेल्या ‘पीडीएम’ने इम्रान खान सरकारला राजीनामा देण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र इम्रान खान यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्याचा निर्णयही “पीडीएम’ने घेतला आहे. मात्र अद्याप त्याची तारीख निश्चित झालेली नाही.