- पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू
- पालिकेच्या शाळांमध्ये जोरदार स्वागत
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग आज सुरू झाले. 1 लाख 19 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी अवघे 25 हजार 745 विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजेच अवघ्या 21 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग आज सुरू झाले. शाळेमध्ये करोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात आल्या. आज तब्बल दहा महिन्यांनी शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे फुले उधळून आणि ढोल वाजवून स्वागत केले.
शहरामध्ये पाचवी ते आठवीच्या महापालिकेच्या 120 शाळा आहेत. त्या सर्व शाळा सुरू झाल्या. या शाळांमध्ये 19 हजार 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 5 हजार 343 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एक हजार शिक्षक उपस्थित होते. शहरामध्ये पाचवी ते आठवीच्या 314 खासगी शाळा आहेत. त्यापैकी 304 शाळा आज सुरू झाल्या. उर्वरित 10 शाळांनी अद्याप करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तयारी केली नसल्याने पहिल्या दिवशी या शाळा सुरू झाल्या नाहीत. खासगी 314 शाळांमध्ये 99 हजार 550 इतकी पटसंख्या आहे. त्यापैकी अवघे 20 हजार 402 विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका आणि खासगी शाळा मिळून 1 लाख 19 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी अवघे 25 हजार 725 विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा सुरू करत असताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे शाळा प्रशासनाला पालन कऱणे बंधनकारक करणयात आले आहे. त्यानुसार शाळांनी तयारी करत आज विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. शाळेमध्ये वर्गखोल्यांची सफाई करणे, जंतुनाशक फवारणी करणे, साबण, पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाने घ्यायची आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांना मास्क परिधान करूनच शाळेत प्रवेश करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक वाहनांची व्यवस्थित स्वच्छता करण्यात. तसेज वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक अंतराचे पालन करण्यास सांगणे आदी नियमांचे शाळा प्रशासनाकडून पालन करण्यात येत होत.
संमती दिलेल्या पालकांनीही विद्यार्थी पाठवले नाही
करोना विषाणू बाबत अद्यापही पालकांच्या मनामध्ये भीती आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून समंतीपत्रक घेणे बंधनकारक केले होते. शहरातील खासगी व महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या 36 हजार 52 पालकांनी संमती पत्रक भरून दिले होते. मात्र अवघे 25 हजार 745 विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजेच जेवढ्या पालकांनी समंतीपत्रक भरून दिले तेवढेही विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते.
शासनाच्या सूचनेनुसार आज पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. आज खासगी व महापालिकेच्या शाळा मिळून 25 हजार 745 म्हणजेच 21 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. हळूहळू विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद वाढत जाईल. पालकांच्या मनातील भीती थोडीसी कमी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये सुरक्षित व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना शिकविले जाणार आहे.
– पराग मुंढे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.