मुंबई – जागतिक बाजारात विक्री वाढली आहे. त्याचबरोबर भारतीय शेअरबाजारातून परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक परत काढून घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे आज सलग पाचव्या दिवशी शेअरबाजार निर्देशांक कमी झाले.
गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 535 अंकांनी म्हणजे 1.13 टक्क्यांनी कमी होऊन 46,874 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 149 अंकांनी कमी होऊन 13,817 अंकांवर बंद झाला.
गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स 2,917 अंकांनी तर निफ्टी 827 अंकांनी कमी झाला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचा शेअर 3.65 टक्क्यांनी कमी झाला. मारुती सुझुकी, एचडीएफसी बॅंक, पॉवर ग्रीड, कोटक बॅंक, इंडसइंड बॅंक, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही गुरुवारी घट झाली. तर ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
अमेरिकेतील शेअरबाजार निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यानंतर युरोपियन आणि आशियाई शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावरही झाल्याचे दिसून आले.
अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. त्याचबरोबर जागतिक शेअर बाजारातही निर्देशांक कमी होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे
वातावरण आहे. मुंबई शेअरबाजाराचे रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू, वाहन, आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक गुरुवारी दोन टक्क्यांपर्यंत कमी झाले. तर तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार आणि बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक वाढले. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.40 टक्क्यांपर्यंत कमी झाले. बुधवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदाराने 1,688 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारही विक्री करू लागले असल्याचे वातावरण आहे.
5 दिवसांत 9.56 लाख कोटींचे नुकसान
गेल्या 5 कामकाजाच्या दिवसांत शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गुरुवारीही शेअरबाजार निर्देशांकांत 1.13 टक्क्यांची घट झाली. गेल्या पाच सत्रात सेन्सेक्स 6 टक्क्यांनी म्हणजे 2,917 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे मुंबई शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 9,56,597 कोटी रुपयांनी कमी होऊन 1,88,13,974 कोटी रुपये झाले आहे. अगोदरच शेअरबाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहेत असे बोलले जाते. त्यातच पुढील आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे वातावरणाचे आहे, असे रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले. कंपन्यांचे ताळेबंद चांगले जाहीर होत आहेत. त्याचबरोबर भारताचा विकासदरही वाढण्याची शक्यता आहे. जर दरम्यानच्या काळामध्ये चांगला अर्थसंकल्प जाहीर झाला तर शेअरबाजार निर्देशांकांच्या पडझडीला लगाम बसेल असे सांगण्यात आले.