नवी दिल्ली – देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी देशातच तयार झालेल्या बॅटऱ्या वापरण्यास प्राधान्य द्यावे असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
इलेक्ट्रिक वाहन वापरण्याबाबत ग्राहकांमध्ये चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. बहुतांश वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करून देण्याबाबत तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनातील महत्त्वाचा भाग असलेली बॅटरी ही भारतातच तयार झालेली असावी याबाबत सरकार आग्रही आहे.
आगामी काळामध्ये बहुतांश वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात परावलंबी राहण्याची भारताची इच्छा नाही. आतापर्यंत बहुतांश क्रुड भारताला आयात करावे लागत होते. आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असे मंत्रालयाने म्हटले आहे. वाहन कंपन्यांबरोबरच इतर संशोधन संस्थांनी बॅटऱ्या बाबत भारताला स्वावलंबी करावे.