नवी दिल्ली – ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दिशेने काढला जाणारा पायी मोर्चा शेतकरी संघटनांनी रद्द केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी (1 फेब्रुवारी) संसदेकडे कूच करण्याची घोषणा याआधी शेतकरी संघटनांनी केली होती.
पायी मोर्चा रद्द करत असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारी कारस्थानाचा फटका ट्रॅक्टर संचलनाला बसला. त्या संचलनात 2 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स आणि लाखों शेतकरी सहभागी झाले. 99.9 टक्के आंदोलकांनी शांतता बाळगली.
हिंसाचार घडवण्यामागे कारस्थान आहे. त्याची चौकशी व्हावी. हिंसाचारामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. त्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मात्र, आमच्याकडे काही व्हिडीओ क्लीपिंग आहेत. त्याआधारे आम्ही आंदोलनाच्या बदनामीसाठी कशाप्रकारे कारस्थान रचले गेले ते उघड करू.
पायी मोर्चा रद्द करण्यात आला असला तरी आमचे आंदोलन चालूच राहील. देशभरात 30 जानेवारीला जाहीर सभा होतील. त्यादिवशी उपोषणही केले जाईल, असे शेतकरी नेत्यांनी नमूद केले.