वॉशिंग्टन- भारत सरकारने आणलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या लाभाचेच असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केले आहे. भारतीय कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा करण्याची गरज आहे त्यासाठी हे कायदे उपयुक्त आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेरही माल विकण्यास अनुमती मिळणार असून त्यावर कोणताहीं कर आकारला जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाच जादा पैसे मिळू शकणार आहेत. जेव्हा अशा प्रकारच्या सुधारणा कोणत्याही क्षेत्रात केल्या जातात त्यावेळी होणाऱ्या संक्रमणाची किंमत मोजावीच लागते. पण हे संक्रमण शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरणार नाही.त्याच वेळी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षाही प्रदान करण्याची गरज आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीच्या नेमक्या स्थितीच्या संबंधात भारतात सध्या चर्चा सुरू असून त्यातून नेमके काय बाहेर येते हे पहावे लागेल असे त्या म्हणाल्या. हे कायदे मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठीच झाले असून त्यातून अंतिमत: शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.