मुंबई – काही दिवसांपूर्वीच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. यामध्ये भाजपमधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. खासदार आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता राणे यांना थेट केंद्र सरकारची सुरक्षा मिळणार आहे.
राज्यातील आजी माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती. त्याचबरोबर नारायण राणे यांच्याकडे असलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपने सडकून टीका केली होती.
आता केंद्र सरकारने एक पाऊल पुढे जात ठाकरे सरकारला दणका दिला आहे. नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे. या व्यतिरिक्त नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. एकूणच राणे कुटुंबाला भाजपकडून संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे.