मुंबई – राज्य सरकारनं मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 12 टक्के आरक्षण दिलं होते. मात्र या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्दावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. भाजपकडून सतत महाविकास आघाडीवर आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका करण्यात येते. त्याला आता महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेनानेते अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा आरक्षणावर 20 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावरूनच आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात भाजप केवळ राजकारण करीत आहे. राजकारणासाठी भाजप मराठा आणि ओबीसी यांना भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणावर निर्णय होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांसाठी बंधनकारक राहिल. भाजपा यात केवळ राजकारण करीत आहे. राजकारणासाठी भाजप मराठा आणि ओबीसी यांना भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
सुनावणी पुढे ढकलणे हा, कामकाजाचा विषय आहे. मात्र मराठा आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला. पुढील महिन्यात ५ फेब्रुवारी रोजी आरक्षणावर सुनावणी होणार आहे.