-विलास कदम
अलिकडच्या काळात जगातील बहुतांश देशांत “कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’ म्हणजेच “करार शेती’चा ट्रेंड वाढत चालला आहे. त्याच्या फायद्या-तोट्याबाबत जाणून घेऊ या…
एखाद्या कंपनीकडून करारानुसार शेती केली जाते आणि नियम, अटीनुसार शेतकऱ्यांना त्याची किंमत दिली जाते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीचे वारे वाहू लागले आहे. पण काही कंपन्या स्वत:चा स्वार्थ पाहतात आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या आपल्या मर्जीनुसार करारातील तरतुदी बदलतात आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त पैसे थोपण्यासाठी मोकळे होतात. एवढेच नाही तर काही वेळा ते कारणांशिवाय करार तोडतात. म्हणूनच अशा कथित कॉर्पोरेट व्यवहारावरून अमेरिकेबरोबरच भारतीय शेतकरी देखील चिंतेत आहेत. म्हणूनच अमेरिकेतही शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत.
काही दशकांपासून करारपद्धतीने होणारी शेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामागचा हेतू हाच की शेतकऱ्यांना आणि पशुपालन करणाऱ्यांना आधुनिक करण्यासाठी अशा प्रकारची शेती उपयुक्त ठरते. या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजाराचाही पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र टीकाकारांच्या मते, या व्यवस्थेमुळे बाजाराची शक्ती ही मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात जाऊ शकते आणि या जोरावर शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होऊ शकते. अर्थात कंपन्यांकडून अशा प्रकारच्या आरोपाचे खंडन केले गेले आणि करारपद्धतीची शेती उपयुक्त असल्याचा दावा केला गेला. कराराने होणारी शेती ही शेतकरी आणि प्रक्रिया करणारी कंपनी या दोन्हीसाठी फायद्याचा व्यवहार आहे, असे कंपनी सांगते. म्हणूनच काही कंपनीच्या संकेतस्थळावर समाधानी शेतकऱ्यांच्या यशोगाथा दिसतात. अर्थात, त्या प्रत्यक्षात असतातच असे नाही. पण या गोष्टी केवळ नेत्यांना खूश करण्यासाठी असतात, असे टीकाकार म्हणतात.
सध्याच्या काळात अमेरिकेत चार कंपन्या 80 टक्क्यांहून अधिक बीफ उत्पादन आणि प्रक्रिया करण्याचे काम करतात. तसेच 2015 मध्ये अमेरिकेतील पाच कंपन्यांचे चिकन मार्केटवर असणारे वर्चस्व हे 60 टक्क्यांपेक्षा अधिक होते. या कंपन्या खाद्य कंपन्या, हॅचरिज देखील चालवतात. या आधारावर ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचा मांसाहार देण्याचा दावा केला जातो. त्याचबराबेर चार बायोटेक कंपन्या या सोयाबीनच्या प्रोसेसिंगच्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. वराह पालनाच्या व्यवसायाशी निगडीत आघाडीच्या चार कंपन्यांचे दोन तृतियांश प्रमाणात बाजारावर नियंत्रण आहे. काही मूठभर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना व्यवहारासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र याबाबत शेतकरी समाधानी असतातच असे नाही. तेही तक्रारी करतात.
शेतकऱ्यांना भूलथापा देऊन फसवले जाते आणि अपेक्षेप्रमाणे करार केला जात नाही किंवा व्यवहार होत नाही. एकंदरित कंपन्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांना वागायला भाग पाडतात आणि स्वत:चे हित साधून घेतात, असेच चित्र दिसते. हा स्वार्थ कधी कधी इतका वाढतो की काही कंपन्या आपल्या करारातील अटी बदलतात आणि मनमानीप्रमाणे अतिरिक्त पैसा वसूल करतात. एवढेच नाही तर ते कोणत्याही कारणाशिवाय करार देखील मोडतात. यामुळे अशा प्रकारच्या कथित कॉर्पोरेट व्यवहारावरून अमेरिकेबरोबरच भारतीय शेतकरी देखील भयभीत झाले आहेत.
शेकडो एकरवर शेती करणाऱ्या अनिवासी भारतीय शेतकऱ्याची नात आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाची विद्यार्थिनी तलहा रेहमान सांगते की, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची बाजाराबाबतची जोखीम कमी राहते. कारण त्यांना खरेदीदार उपलब्ध असतो. त्यांच्या मनात सुरक्षेची भावना तयार राहते. परंतु पारदर्शकतेचा अभावही दिसून येतो. या व्यवहारावर आणि बाजारावर आपले नियंत्रण नसते. आपल्या वस्तूला किती किंमत मिळणार आहे, हे ठाऊकही नसते.
तलहा रेहमान सांगते की, जर करार शेती योग्यरितीने झाली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण ते होईलच याची खात्री देता येत नाही. विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनुसार पिकाला किमान आधारभूत मूल्य मिळणे गरजेचे आहे आणि मूल्य सरकारने निश्चित करायला हवे. कोणत्याही स्थितीत त्यापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळू नये, याची देखील खबरदारी घेतली पाहिजे. मूल्य वाढते तेव्हा शेतकरी त्यास नकार देतात आणि किमतीत घसरण होते तेव्हा खरेदीदार मनाई करतात. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत जाते.
अमेरिकेतही शेतकऱ्यांची आत्महत्या
भारतात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही शेतकरी आत्महत्या करतो, ही बाब अविश्वसनीय आहे. याबाबत निश्चित आकडा नसला तरी सीडीसीनुसार (सेंटर फॉर डिसीज) अन्य देशांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. सीडीसीच्या सर्व्हेनुसार दोन दशकांत कमी काळात आत्महत्येच्या प्रकरणात 40 टक्के वाढ झाली आहे. कर्जबाजारीपणा, धान्याला मिळणारा कमी भाव किंवा खराब हवामान या गोष्टी अमेरिकेतील शेतकऱ्यांनाही हताश करतात.