सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि. 18 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. ही प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्र व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सुमारे दहा हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले होते. जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) चुरशीने मतदान झाले. सातारा तालुक्यात 89 ग्रामपंचायतींसाठी एक लाख 21 हजार 382 पैकी 97 हजार 132 मतदारांनी हक्क बजावला. सरासरी 80.2 टक्के मतदान झाले.
जावळीत 37 ग्रामपंचायतींसाठी 23 हजार 419 पैकी 17 हजार 787, म्हणजे सरासरी 75.95 टक्के मतदान झाले. वाई तालुक्यात 57 ग्रामपंचायतींसाठी 67 हजार 718 पैकी 55 हजार 273, म्हणजे सरासरी 81.65 टक्के मतदान झाले. खंडाळा तालुक्यात 50 ग्रामपंचायतींसाठी 66 हजार 413 पैकी 56 हजार 808, म्हणजे सरासरी 85.53 टक्के मतदान झाले.
माण तालुक्यात 47 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाले. महाबळेश्वर तालुक्यात 14 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाले. खटाव तालुक्यात 76 ग्रामपंचायतींसाठी एक लाख 35 हजार 492 पैकी एक लाख 6 हजार 478, म्हणजे सरासरी 78.60 टक्के मतदान झाले. कराड तालुक्यात 87 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 85 टक्के मतदान झाले.
पाटण तालुक्यात 72 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 76 टक्के मतदान झाले. यंदा अपेक्षेप्रमाणे चांगले मतदान झाल्याने सत्ता कोणाची येणार, याची उत्सुकता गावोगावी लागली आहे. मतमोजणी सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.