जळगाव – जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मूळ रहिवासी असलेले उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार यांचा 10 ते 12 जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करून दक्षिण आफ्रिकेत खून केला आहे. ही घटना आफ्रिकेतील वेळेनुसार गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली असून शनिवारी सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मणियार यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्याने स्वत:ला मणियार यांच्या अंगावर झोकून दिले. मात्र, समोर सशस्त्र 10 ते 12 जण असल्यामुळे ते काहीही करू शकले नाही. मणियार यांचा जागीच मृत्यू झाला. सहकारी देखील गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून फरार संशयितांना शोधण्यासाठी श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही जण वर्णभेदाच्या कारणावरून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत तर काही जण व्यावसायिक स्पर्धेतून खून झाल्याचे बोलत आहेत.
मणियार हे 10 वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलांसह दक्षिण आफ्रिकेतील एंटानानारिवो येथे स्थायिक झाले होते. तेथे त्यांची स्वत:ची जार्डिन मेबल नावाची कंपनी आहे.