मुंबई – महाराष्ट्र सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंब, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. राज्य भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी या निर्णयाला सूडाचे राजकारण असे म्हटले आहे.
आठ जानेवारीला सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांना ‘झेड प्लस’ श्रेणी ऐवजी एस्कॉर्टसह ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तर माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांची एस्कॉर्टसह ‘वाय प्लस’ श्रेणी कमी करून ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना आता ‘वाय प्लस’ ऐवजी ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळणार. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ‘झेड’ श्रेणी सुरक्षा कमी करून एस्कॉर्टसह ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
राणे यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा होती. याशिवाय राज्य लोकायुक्त एम. एल. टाहिलियानी यांची ‘झेड’ श्रेणी कमी करून ‘वाय’ श्रेणी सुरक्षा करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार सरकारने दोन लोकांची सुरक्षा वाढविली असून 11 नेत्यांची सुरक्षा कपात केली आहे, 16 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, तर 13 नव्या लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे. सरदेसाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे नोतवाईक आहेत. या दोघांना ‘एक्स’ श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.