नवी दिल्ली – करोनानंतर आता देशात पुन्हा एका संसर्गजन्य आजाराची चर्चा सुरू झाली आहे. या रोगाचं नाव आहे, बर्ड फ्लू. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागानं हायअलर्ट जारी केला आहे. बर्ड फ्लूच्या बातम्या येतात, तशा कोंबड्यांच्या पोल्ट्री रिकाम्या केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात. उलटसुलट चर्चा सुरु होतात, आणि लोकांमध्ये दहशत पसरते. पण, हा रोग आहे तरी काय? हा करोनाहूनही अधिक घातक आहे का? आतापर्यंत बर्ड फ्लूमुळं जगभरात किती लोक दगावले आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे आवश्यक आहे.
* ‘बर्ड फ्लू’ म्हणजे काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.
* भारतात बर्ड फ्लू पहिल्यांदा कधी उद्भवला ?
भारतात 2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही.
* बर्ड फ्लूची लक्षणं काय?
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव अथवा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफाचा त्रास होतो. रोग जास्त पसरला असल्यास न्युमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या करोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो, असे बोलले जात आहे.
* बर्ड फ्लूवर इलाज आहे का?
बर्ड फ्लूवर इलाज असून औषधही उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरू करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.
* बर्ड फ्लूच्या नावातील ‘एच’, ‘एन’ चा अर्थ काय?
पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील ‘एच’ म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि’एन’ म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. ‘एच’ म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर ‘एन’ म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त एच 5, एच 7 आणि एच 10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं एच 5 एन 1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो.
यामधील एच 17 एन 10 आणि एच 18 एन 11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.
* बर्ड फ्लू सर्वात आधी कुठे आढळला, आणि त्याचा इतिहास काय?
-1900च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता.
-1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले.
– 1983 साली पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूनं थैमान घातलं. त्यानंतर 50 लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आलं.
– 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये 18 लोकांना हा फ्लू झाला. त्यातील 5 लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमध्ये तब्बल 15 लाख पक्षांना मारण्यात आलं.
– 2003 साली नेदरलँडमध्ये 84 लोकांना एच 7 एन 7 या नवीन स्ट्रेनचा फ्लू झाला, त्यातील एकाचा मृत्यू झाला.
– 31 जुलै 2012 ला एच 3 एन 8 या नव्या फ्लूच्या स्ट्रेनमुळं तब्बल 160 सील माशाच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याचं शास्रज्ञांनी उघड केलं.
– 2019 ला जगभरात तब्बल 1568 लोकांना या फ्लूची लागण झाली,तर त्यातील 616 लोक दगावले, हा एच 7 एन 9 प्रकारातला फ्लू होता.
* बर्ड फ्लू- अफवा आणि वास्तव
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते अतिशय कमी आहे.