खेळ कोणताही असो त्यात ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचे असेल तर केवळ कामगिरी हा निकष नसतो, त्यासाठी खेळाडूला सुविधा काय मिळाल्या, त्या कोणत्या दर्जाच्या होत्या हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. देशातील अनेक खेळाडू आगामी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत. त्यात महाराष्ट्रातीलही खेळाडूंचा समावेश आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टॉप) या योजनेचा हिस्सा असूनही जर त्यांना सुविधा मिळण्यात अडचण येत असेल तर केवळ लोकाश्रय मिळून चालत नाही, तर त्यांना राजाश्रय मिळणेही अत्यंत महत्त्वाचे असते.
महाराष्ट्राची नामांकित नेमबाज राही सरनोबत व तेजस्विनी सावंत तसेच धावपटू अविनाश साबळे, पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. योग्य निर्णय योग्य वेळी घेणे महत्त्वाचे असते व सरकारने तेच केले आहे. या खेळाडूंना सरावासाठी योग्य सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी, सरावासाठी हा निधी अत्यंत आवश्यक होता.
दर चार वर्षांनी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे स्वप्न जवळपास प्रत्येक खेळाडूचे असते. त्यातही देशाचे प्रतिनिधित्व करताना या खेळाडूंना प्रोत्साहनाबरोबरच अर्थसहाय्यही गरजेचे असते. खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात यशस्वी होत असले तरी त्यामागे अनेकांचे सहाय्य असते. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर ज्या खेळाडूंना राज्य सरकारने मदतनिधी दिला आहे त्यांच्याकडून ऑलिम्पिकपदकाची खात्री आहे. त्यांच्याकडून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळाली असली तरीही ऑलिम्पिकपदक हा कळसाध्याय ठरतो. राष्ट्रकुल स्पर्धेत 4 तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 2 पदके राहीने मिळवली आहेत. दुसरीकडे तेजस्विनीने 2010 म्युनिक विश्वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले आहे. बीडचा केवळ 26 वर्षांचा धावपटू अविनाश साबळे याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत याच प्रकारात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करताना 8 मिनिटे व 21.37 सेकंद वेळ दिली होती.त्याच्याकडून याच क्रीडा प्रकारात टोकियोत अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा आहे.
2009 साली नेमबाजीला सुरुवात केलेला स्वरुप उन्हाळकरने 2012 सालापासून स्पर्धांमध्ये आपला दर्जा सिद्ध केला. त्याला गेल्या वर्षी राज्य सरकारने मानाचा श्री शिवछत्रपती पुरस्कारही दिला होता. पोलिओ झालेला असतानाही त्याच्याकडून टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत यशाचा विश्वास आहे. त्याचबरोबर प्रवीण जाधवनेही आपला दर्जा सिद्ध करताना गेल्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेत रजतपदक विजेत्या भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू ठरला होता. त्याने तिरंदाजीत भारतीय संघाकडून ही कामगिरी केली होती व 2005 सालानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत पात्र ठरला होता. या सर्व खेळाडूंना राज्य सरकारने मोठ्या रकमेचा निधी दिला असून आता टोकियोत त्यांच्याकडून पदकाची निश्चिती देखील होईल असा विश्वास बाळगायला हरकत नाही.
– अमित डोंगरे