बीजिंग – तिबेटमधील दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेसाठी रूळ टाकण्याचे काम चीनने गुरूवारी पूर्ण केले. ते रूळ सीमेलगत अरूणाचल प्रदेशच्या जवळच टाकण्यात आले आहेत. चीनी कुरापतींमुळे काही महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणावाची स्थिती आहे. तो तणाव दूर करण्यासाठी भारत प्रयत्नशील असला तरी चीनने आपले कारनामे थांबवलेले नाहीत.
सीमेलगत चीन बांधकामे करण्याचा खटाटोप करत असल्याची माहिती सातत्याने पुढे येत असते. अशातच तिबेटमध्ये त्या देशाने दुसऱ्या रेल्वेमार्गाची तयारी पूर्ण केल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यातच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना संबंधित प्रकल्पाचे काम वेगात करण्याचा आदेश दिला होता. सीमेवरील स्थैर्य अबाधित ठेवण्यासाठी तो रेल्वे प्रकल्प महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अरूणाचलच्या काही भागांवर दावा सांगण्याचा प्रयत्न चीनकडून नेहमी केला जातो. त्यामुळे चीनकडून केल्या जाणाऱ्या हालचालींबाबत भारताला दक्ष रहावे लागणार आहे. अरूणाचल हा आमचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने सातत्याने ठणकावले आहे. तसे असले तरी चीनच्या कुरापती थांबताना दिसत नाहीत.